पुणे: एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद आहे. केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. तशी पुस्तकं माझ्याही घरात आहेत. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं आहे. पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचं स्पष्ट दिसतं आहे,’ असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.
पुण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भाजप सरकारच्या काळात उद्भवलेल्या विविध सामाजिक संघर्षावर सविस्तर भाष्य केलं. तसंच, त्यावेळच्या भाजप सरकारनं कशी चुकीची भूमिका घेतली, हेही पवार यांनी सांगितलं. पुण्यातील एल्गार परिषदेतून सामाजिक सौहार्द बिघडवल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांनी अनेक लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. अनेकांना अटकही करण्यात आली होती. आजही त्यापैकी काहीजण न्यायालयीन लढाई लढत आहेत. शरद पवार यांनी या कारवाईबद्दलच शंका उपस्थित केली. ‘एल्गार परिषदेत दडपशाहीविरोधात आवाज उठवला गेला होता. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या गेल्या होत्या. विद्रोही विचारांच्या कविता वाचणं किंवा घरात नक्षलवादी साहित्य वाचणं, हा काही अटकेचा आधार होऊ शकत नाही. माझ्याही घरात नक्षलावादाशी संबंधित साहित्य आहे. आम्हीही माहिती घेत असतो. वाचन करणाऱ्यांकडं अशी पुस्तकं असतातच. याचा अर्थ ते नक्षलवादी आहेत असा होत नाही,’ असं पवार म्हणाले. ‘लोकशाहीत तीव्र भावना मांडल्या जातात. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तसे झाले होते. मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचा खटला टाकला नव्हता,’ याची आठवणही त्यांनी दिली.
एल्गार प्रकरणात सत्तेचा पुरता गैरवापर झाला आहे. दलितांसाठी काम करणाऱ्यांवर कारवाई केली गेली’, असं म्हणत, पवारांनी पोलीस कारवाईला बळी पडलेल्या कार्यकर्त्यांची नावंच वाचून दाखवली. सुधा भारद्वाज, गडलिंग, वरवरा राव, कॉ. ढवळे हे सगळे लोक दलित, शोषितांसाठी काम करतात. त्यांच्यावर कारवाई केली गेली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणली. पोलिसांचं वागणंही आक्षेपार्ह होतं. आजी किंवा माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांना मी तशी विनंती करेन,’ असं पवारांनी सांगितलं. तुमचा या कार्यकर्त्यांना पाठिंबा आहे का, असं विचारलं असता, पवारांनी सावध उत्तर दिलं. या प्रकरणाची चौकशी करा, असं माझं म्हणणं असल्याचं ते म्हणाले.