अहमदनगर – शिर्डीतील बंदला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. साईबाबा यांच्या जन्मस्थळाचा वाद व्हायलाच नको असे विखे पाटील म्हणाले आहेत. साई मंदिर शिर्डीत असले तरीही परभणी जिल्ह्यातील पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान आहे असा दावा केला जात आहे. सरकारने या ठिकाणी विकासासाठी निधी सुद्धा मंजूर केला. याच मुद्द्यावरून शिर्डीच्या संतप्त स्थानिकांनी बेमुदत संप पुकारला. या संपकऱ्यांची विखे पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतरच आंदोनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
- साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा
- श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे, त्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात सोमवारी (दि. २० ) मंत्रालयात बैठक होणार आहे.
शिर्डीतील संपकऱ्यांची भेट घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच साईबाबा जन्मस्थळाचा वाद व्हायलाच नको होता. तरीही मुख्यमंत्र्यांच्या वतीने पाथरीसाठी निधी मंजूर करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करण्यात आली. तसेच त्यांना चुकीची माहिती देण्यात आली असा दावा यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशाच्या विविध भागांतून आलेल्या साईभक्तांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखामुळे भावनांचा अनादर केला जात असल्याची भावना व्यक्त केली. तर काही साईभक्त या बेमुदत बंद आंदोलनात सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिर्डीत येणाऱ्या बहुतांश भाविकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शिर्डीकरांच्या आंदोलनाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.