मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच वळण आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापना होण्याच्या मार्गावर असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. यासर्वाशी शरद पवारांचा काहीही संबंध नसल्याचे संजय राऊत यांनी म्हणले आहे. संजय राऊत म्हणाले, “अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्याबरोबर होते, पण ते संपूर्ण बैठकीमध्ये आमच्यानजरेला नजर भिडवून बोलत नव्हते त्यांची बॉडी लँग्वेजदेखील संशयास्पद होती. हे सर्वांच्या लक्षात आले आणि त्यानंतर ते अचानक बाहेर पडले.
या सर्व घडामोडींशी शरद पवारांचा काहीही संबंध नाही. ईडीच्या नोटिशीनंतर अजित पवार जे वागले त्यानंतरच मला संशय आला होता. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.रात्रीच्या अंधारामध्ये पाप होते. दिवस असताना लोकांच्या समोर तुम्ही शपथ का घेतली नाही. याचाच अर्थ तुम्ही चोरी केली आहे. शिवसेना खंबीर आहे. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक होईल. काहीतरी चांगले घडत असताना हे सर्व पैसे आणि सत्तेचा वापर करून झाले आहे. काळोखातील पापे काळोखातच नष्ट होतात. डोळे उघडण्यापूर्वी ते नष्ट होतात. येथून पुढे जर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही.”