पुणे- चळवळ ही भावनांवर नव्हे, तर विचारांवर उभी रहात असते. भारताच्या विचारवैभवाचा झेंडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतातच नाही तर पाश्चात्य देशातही फडकावला. यादृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे आणि वेगळ्या धाटणीचे आहे, असे मत ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, रिपब्लिकन युवा मोर्चा, महाराष्ट्रचे अध्यक्ष राहुल डंबाळे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या अध्यक्ष सुवर्णा डंबाळे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्येक कृती वैचारिक परिमाणांवर, निकषांवर तोलून मापून पाहिल्यास बाबासाहेब द्रष्टे होते, हे अधोरेखित होते. बाबासाहेबांनी जातीयता नेहमीच निषेधार्ह मानली. परंतु, आजही समाजात काही घटकांकडून जातीयता पोसली जाते. भारताला स्वातंत्र्य मिळूनही भारतासारख्या भल्यामोठ्या लोकशाही देशात आजही जातीयता शिल्लक असेल, तर त्याविषयी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. भारतासारख्या बहुधार्मिक देशात बुद्ध कसा टिकवायचा, हा प्रश्न आहे. बहुधार्मिक ऐक्य साधता आले पाहिजे. संविधानाला कोणताही धर्म नसून सत्य मेव जयतेच्या पायावर संविधान उभे आहे. अशाही परिस्थितीत सामाजिक, आर्थिक असमतोल दिसून येतो. समाजाच्या सर्व घटकांमध्ये सामाजिक आणि आर्थिक समता परावर्तीत होणे, हे संविधानाचे खरे सूत्र आहे. परंतु, ही समता प्रस्थापित न होता शोषण व्यवस्था निर्माण होत आहे.
यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच जगण्याचा आत्मविश्वास दिला. आज राजकीय क्षेत्रात बहुजनांचे जे नेतृत्व दिसत आहे, त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचेच आशीर्वाद कारणीभूत आहेत. लोकशाहीविरोधी ताकदींनी संविधानाचे जाहीर दहन केले, हे निषेधार्ह असून संविधानाचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे. संविधान टिकले, तरच लोकशाही टिकेल.
यावेळी बोलताना आमदार चेतन तुपे म्हणाले की, चळवळीतील तरुणांना संविधानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना अॅड. जयदेव गायकवाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आजही मार्गदर्शक असल्याने लोकशाहीचा गाडा सुरळीतपणे हाकला जात आहे. बाबासाहेब हे ज्ञानाचे उपासक होते. ते बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी पाश्चात्य देशात गेले असताना त्यांनी तेथील वंचित, दुर्लक्षित, शोषित घटकांचा अभ्यास केला. त्यावरून भारतातील वंचित, दुर्लक्षित, शोषित घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रारूप तयार केले. भारतीय परिप्रेक्ष्यातून त्यांनी पाश्चात्य क्रांती आणि चळवळींचा अभ्सास करून त्यावरून भारतातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राहुल डंबाळे, परशुराम वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपब्लिकन युवा मोर्चाच्या अध्यक्ष सुवर्णा डंबाळे यांनी केले. सूत्रसंचालन रिपब्लिकन युवा मोर्चाचे महासचिव विठ्ठल गायकवाड यांनी केले.