पुणे-मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्याने पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न जटील झाला आहे , मेट्रोने तो सुटणार नाही असे सांगत आज बाणेर येथे पार्किंगच्या कारवाई वरून नागरिक आणि पोलीस यांच्या उद्भभवलेल्या वादाच्या प्रसंगाचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला . खासदाराची गाडी ट्राफिक मध्ये अडकल्याने या भागात नो पार्किंग चा झोन करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला .कोथरूड येथील जाहीर सभेत ते बोलत होते .
कोथरुडमध्ये भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला कारण तुम्हाला गृहित धरलं गेलं आहे. आम्ही कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातले आहेत तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं रहायला तुम्हाला भीती का वाटली? असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी कोथरुड येथील सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. सत्ता डोक्यात जाते तेव्हा अशा कृती केल्या जातात असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्राला काय झालं आहे ते मला समजत नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचा तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. एवढंच नाही तर कोथरुडची निवडणूक तुम्हा सगळ्यांसाठी सोपी आहे. तुम्हाला स्थानिक उमेदवार हवा आहे की बाहेरुन आयात केलेला उमेदवार हवा आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. निवडणूक झाल्यावर चंद्रकांत पाटील हे मतदारांच्या हाती तरी लागणार का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
महापुरुषांचीही वाटणी जातीनिहाय वाटणी करण्यात येते आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. शिवाजी महाराज मराठ्यांचे, सावरकर ब्राह्मणांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे अशी जातीनिहाय वाटणी केली जाते आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. महाराष्ट्राने देशाला प्रबोधनाचा विचार दिला आहे आज या महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न पडतो असंही राज ठाकरे म्हणाले.
मध्यंतरी पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यात उद्ध्वस्त केला गेला. ज्यांनी उमेदवार हा उद्ध्वस्त केला त्यांना रामगणेश गडकरी ठाऊक आहेत का? केला त्यांना राम गणेश गडकरी माहित तरी आहेत का? आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. तो मेट्रोने सुटणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
– मनमोहन सिंग मोठे अर्थतज्ज्ञ, विद्वान आहेत. ते म्हणाले तेव्हा काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितले की मंदीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर होईल. त्याची सुरुवात झाली आहे.
– २०१७साली नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवस द्या असे सांगितले होते. आता २०१९ सुरु आहे मात्र तरीही मंदी आहे.
– पुण्याचे खासदार ट्रॅफिकमध्ये अडकले तेव्हा बाणेरचा रस्ता रिकामा करायला निघाले, मग आम्ही अडकलो तर काय करायचं ?
-आज पुण्यासारख्या शहरात वाहनांचा सर्वाधिक धोका आहे. इथले रस्ते अपुरे आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क होतात कारण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात.
-विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका नाही. नरेंद्र मोदींच्या भूमिका चुकल्या त्यावर प्रहार केले आणि ३७० साठी अभिनंदन करणारा मीच होतो. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते ३७० सोडून महाराष्ट्राचे तरुण, तरुणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कधी बोलणार?
-सत्त्ताधाऱ्यांची सभांसाठी आणि मेट्रोसाठी रात्रीतून झाडे छाटण्याची हिंमत कशी होते यामागचे कारण सत्ता डोक्यात जाते.
– आमचे उमेदवार स्थानिक आहेत, सत्तेची हवा डोक्यात न जाणारे आहेत. आणि ती गेलीच तर टाचणी लावायला मी आहेच.