आजचा रंग कोणता ?? नवरात्र सुरू झाली आणि मराठी वर्तमानपत्र, मोबाईल मधील ‘उद्या कुठला रंग’ याच मेसेजनी धुमाकूळ घातला आहे. खरं तर ८-१० दिवस आधीपासूनच महिला वर्गाची तरी जय्यत तयारी सुरू होते आणि मग त्या नवरंगामधील एखादा रंग नाही आहे तर लगेच खरेदीकडे मोर्चा वळतो. माझ्या एका मैत्रिणीने (मेधा मराठे) तर ८ दिवस आधीपासूनच व्हाट्सअपच्या डीपीमध्ये ९ रंगाच्या साड्या ठेवल्या होत्या. नवरात्र सुरू झाल्यापासून सगळीकडेच बस, ट्रेन, ऑफिस, कॉलेज त्या त्या दिवशीचा रंग दिसतो आहे. एका मराठी दैनिकात तर त्या दिवशीच्या रंगाचे ग्रुप फोटो ही प्रसिद्ध होतात. मग तू साडी नेसणार की ड्रेस…त्यावर मोत्याचे दागिने चांगले दिसतील की थ्रेडचा सेट घालू…ए, पण ऑफिसमध्ये आल्या आल्याच फोटो काढू या गं…मग नंतर अगं मेकअप लाईट होतो. सगळीकडे अश्या प्रकारचे धम्माल संवादही कानावर पडताहेत. एकूणच काय तर या रंगाच्या दुनियेत सगळेच रंगून गेले आहेत.
एकीकडे रंगभरे मोसमचा अनुभव काही जण घेत असतात, दुसरीकडे आजे क्या रमवा जवानू?… कोणा पासेस छे तारी पासे ?…फाल्गुनी ना के प्रीती ना ?…आज कुठे गरबा-दांडिया खेळायचा जायचा आहे यावर चर्चा रंगते आहे. बघाल तर गरबा आणि दांडिया चांगला खेळता यावा म्हणून त्याची प्रॅक्टिस महिनाभर आधीच चालू होते, एवढेच नाही तर त्यासाठी कोरिओग्राफरना अपॉईंट केलं किंवा केली जाते. मोठमोठ्या गरबा इव्हेंट्समध्ये चांगलं खेळणाऱ्याला आकर्षक बक्षिसेही असतात. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. जणू काही सगळ्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे असेच वाटते.
डीजेच्या तालावर बेफाम होऊन नाचणाऱ्यांना पाहिलं की पूर्वीचा गरबा आठवतो…केटला वागे आरती आजे ? …कांता बेनला विचारणा व्हायची कारण त्यांच्या घरी गरबा असायचा आणि देवीचा फोटोही त्यांच्या घरूनच यायचा. रात्री ८.३० वाजले की आम्हा मुलांची गडबड सुरू व्हायची कांता बेन आणि त्यांच्या घरातील कधी मैदानात येणार ते. त्यांच्या घरून कोणी लाकडी खुर्ची घेऊन जाताना दिसलं रे दिसलं की आम्ही सगळ्या मुलांनी या ए विंगच्या मैदानात धूम ठोकलीच म्हणून समजा. मोठ्या लाकडी खुर्चीत त्या देवीचा फोटो लाल चुनरी ओढून ठेवायच्या आणि समोर गरबा. हळूहळू बिल्डिंगमधले सगळेच आरतीसाठी जमायचे. त्यावेळी प्रसाद म्हणून मोठाले साखर फुटाणे द्यायचे. आरती झाली की गरबा चालू व्हायचा. पारंपरिक गरब्याची गाणी म्हणायच्या. कांताबेन, हेमलताबेन, मन्ना फोई, ईला काकी, शांताबेन, संगीता भाभी सगळ्याच गरबा गायच्यात. केसरीयो रंग तारो…, डोंगर उपर बोले छे मोर…, अशी पारंपरिक गाणी असायची. कधी एक टाळीचा गरबा, कधी २ टाळीचा गरबा कधी ३ टाळीचा गरबा. आधी हळूहळू गरबा खेळता खेळता मग स्पीड कधी पकडला जायचा तेच कळायचं नाही. अशावेळी मग ज्यांना इतक्या जलदतेने गरबा खेळायला यायचा नाही त्या बाहेर पडायच्या. गरबा खेळायला बायका, मुले तसेच पुरुष मंडळीही तितक्याच उत्साहाने भाग घ्यायचित. आधी गरबा आणि मग दांडिया. शेवटचे २-३ दिवस ढोलकवाले सुद्धा यायचे. नऊ दिवस मस्त मंतरलेले असायचे. त्या वेळीही रंगाची मजा होती. रोज ठरवले जायचे उद्या कोणत्या रंगाची साडी नेसायची. मग त्या त्या दिवशी त्या रंगाची साडी किंवा चनिया चोळी घालून नटूनथटून सगळ्या यायच्या. त्या काळी या नवरात्रीच्या रंगांना हल्ली एवढं ग्लॅमर आणि प्रसिद्धी नव्हती की फोटो काढण्याची फॅशन. मात्र या सगळ्या आठवणी स्मृतीपटलाच्या फोटो फ्रेममध्ये कायमच्या बंदिस्त आहेत! खास आकर्षण असायचे ते विसावाच्या गल्लीतील देवीचे, कारण देवीला पुण्याचा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचे डेकोरेशन असायचे आणि दुसरे आकर्षण म्हणजे शिवाजी पार्कची बंगाली देवी. अष्टमीला ब्राह्मण सेवा मंडळात होम असायचा, त्यावेळी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असायचा. घागरी फुंकणाऱ्या बायकांना पाहून खूप भीती वाटायची. त्यांना मी तरी लांबूनच नमस्कार करायचे. मंडळात रोज भोंडल्याचा कार्यक्रम असायचा. आजही होतात हे कार्यक्रम असे म्हणण्यापेक्षा आता हे सगळे इव्हेंट आहेत, त्यांना ग्लॅमर आहे.
काही जण रंगांत दंग आहेत, तर काही जण गरबा दांडियात रंगून गेले आहेत. तर काही जण नऊ दिवस उपवास आणि देवीच्या दर्शनात मग्न आहेत.
आजही कुठे तरी जुन्या बिल्डिंगच्या अंगणात अंबा मातेची आरती आणि गरबा गातानाचा आवाज कानावर पडला की मन तिथेच रेंगाळते…मग वाटते नवरात्रीचे महत्त्व आणि पारंपरिकता अजूनही जपली जातेय…!
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068