पुणे-गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील सर्व विभाग नियमित सुरू झाले आहेत. शहरात सर्वत्र भाजीपाला आणि किराणा मालाचा पुरवठा दैनंदिन होणार आहे. गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारात शुक्रवारी (ता.२७) १२० गाड्या आवक झाली, तर उपबाजार मोशी येथे १५७, उत्तम नगर येथे १२ गाड्यांची आवक झाली आहे.शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात घेऊन यावा असे आवाहन प्रशासक बी जे. देशमुख यांनी केले मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मार्केट यार्डातील आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. यामुळेच शुक्रवार (दि.27) रोजी झालेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंतचा बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील आडत्यांनी भाजीपाला, फळे आणि कांदा व बटाटा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय दि.पूना मर्चट चेंबरने देखील 31 मार्च पर्यंत भूसार व गूळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
परंतु जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार चेंबरने शुक्रवार (दि.27) पासून बाजार सुरू केला आहे. . या पार्श्वभूमीवर आज आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची बैठक झाली. यामध्ये बाजारा मध्ये होणाऱ्यां गर्दीमुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच मार्केट यार्डातील बाजार सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी आडत्यांनी केली.यामध्ये लॉकडाऊन मुळे खरेदीदारांची वाहने बाहेर पोलिसांकडून अडवली जाणार नाहीत. तसेच, खरेदीदारांना त्यांना स्टॉल, हातगाडीवर किरकोळ विक्री करण्यास परवानगी दिली पाहिजे .तरच ते मार्केट यार्ड तून फळे आणि भाजीपाला खरेदीदार खरेदी करतील. अन्यथा मार्केट याडार्तील मालाची विक्री होणार नाही. त्यामुळे त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे. तसेच कामगार देखील आपल्या गावाला गेल्याने कामगारांचाही प्रश्न आहे.परंतु कामगार संघटनांनी रविवार पासून कामगार कामावर हजर होणार असल्याचे सांगितले.
कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, सुरवातीला बाबा आढाव यांच्या सोबत बैठक झाली. त्यानंतर बाजार समिती प्रशासक, पदाधिकारी यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी आम्ही काही मागण्या केल्या. त्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना केंद्रशासनाने ५० लाखांचा विमा दिला आहे. त्या धर्तीवर बाजार आवारातील सर्व घटकांना शासनाने किंवा बाजार समितीने विमा द्यावा. याबाबत प्रशासक यांनी मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी ही मागणी तत्वतः मान्य केली आहे.
तसेच बाजार आवारात एक दिवस फळे, कांदा बटाटा आणि एक दिवस तरकरी विभाग चालू ठेवावा. जो विभाग बंद आहे त्या विभागात अडत्यांना रिकाम्या जागा द्याव्या. त्यामुळे बाजारात गर्दी कमी कशी होईल हे पाहावे. तसेच पहाटे पाच वाजण्याच्या आधी शेत मालाच्या गाड्या खाली करून बाहेर पाठवाव्या. त्यामुळे पहाटेच्या वेळी असणारे कामगार लवकर बाहेर पडतील. बाजारात ठराविक अंतर ठेऊन काम करणे याबाबत बाजार समिती सकारात्मक आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून कामगार कामास सुरुवात करणार असल्याचे नांगरे यांनी सांगितले. त्यामुळे मार्केट यार्ड सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.