-भारतीय संस्कृतीमधील सर्वांचे योगदान पुढे यावे : डॉ. राजा दीक्षित
पुणे:
‘भारतीय संस्कृतीत सर्व धर्म, पंथ, संस्कृतींचे योगदान आहे, याचे भान ठेवले पाहिजे. इतिहास ही कोणा एकाची कथा नसून सर्व समाजाची कहाणी आहे.ती मांडण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. इतिहासाची साधने पुढे आणल्याशिवाय त्याचा अन्वयार्थ मांडता येणार नाही.ही साधने आणण्याचा प्रयत्न होतो आहे ,ही चांगली बाब आहे ‘, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ. राजा दीक्षित यांनी आज केले.
‘आसिफजाही – खंड 1′ आणि’ तिहेरी तलाक’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज डॉ. राजा दीक्षित, ( माजी इतिहास विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), कथाकार असगर वजाहद यांच्या हस्ते पुण्यात झाले. त्यावेळी डॉ. दीक्षित बोलत होते.डॉ. के. जी. पठाण (माजी अधिष्ठाता, भारती विद्यापीठ, पुणे) अध्यक्ष स्थानी होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, “इतिहास वस्तूनिष्ठ असणे हे मिथक आहे.आपले इतिहासाचे अभ्यास उत्तर केंद्री आहेत, हे खरेच आहे. दक्षिणेतील ७ निझामांची सकारात्मक बाजू पुढे आणण्याचा प्रयत्न ‘ आसिफजाही ‘ पुस्तकातून झाले, ही जमेची आणि स्वागतार्ह बाजू आहे. मात्र, इतिहास मांडताना राजेशाहीचे उदात्तीकरण होता कामा नये. विचारांशी बांधिलकी ठेवताना अभिनिवेश बाळगता कामा नये.”
असगर वजाहद म्हणाले, ” इतिहास हा आपल्या घरचा पत्ता आहे, तो विसरून चालणार नाही. गांभीर्याने इतिहासाचे संशोधन झाले पाहिजे. वाचकांपुढे चुकीचा इतिहास आणला जातो, त्या विषयी वाचकांची समज वाढविण्याची गरज आहे. “
शब्द पब्लिकेशन, मुस्लिम अकादमी, युवक क्रांती दल आयोजित हा प्रकाशन सोहळा 2 डिसेंबर 2019 रोजी सांयकाळी 6:30 वाजता,सोमवारी
जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे हा प्रकाशन सोहळा झाला.
निजाम राजवटीचा इतिहास असलेले ‘आसिफ जाही “हे पुस्तक कलीम अझीम, सरफराज अहमद, सय्यद शहा यांनी लिहिले आहे.” तिहेरी तलाक” हे पुस्तक कलीम अझीम यांनी लिहिले आहे.
लेखक सरफराज अहमद म्हणाले, ‘ एकमेकांमधील सांस्कृतिक संवाद वाढला पाहिजे. तरच गैरसमज दूर होतील. आसिफजाही या राजवटीबद्दल आपण निझामशाही म्हणतो, हे न पटणारे आहे. रझाकारांच्या पुढेमागे बराच इतिहास आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. निझामाने अजिंठा -वेरूळ लेणी संवर्धनासाठी पैसे खर्च केले, पुस्तक केले, शैक्षणिक विकास केला , वैद्यकीय ज्ञान स्थानिक भाषेत आणले याकडेही लक्ष दिले पाहिजे.जलसंधारणांचे प्रयत्न , रेल्वे उभारणी याची दखल घेतली पाहिजे. वस्तुनिष्ठ मूल्य भान समोर यावे, म्हणून आम्ही १० खंडातून निझाम कालखंडातील ( आसीफ जाही) कागदपत्रे पुढे आणत आहोत. निझाम असो टिपू सुलतान असो, मूळ कागद न पाहता लिहिले जाते. त्यामुळे खरा इतिहास पुढे येत नाही. असे लिखाण करणाऱ्यात इतिहासकार, माजी कुलगुरु, संशोधक, पत्रकार अशा अनेकांचा समावेश आहे. मुस्लीम समाजाचा सांस्कृतिक इतिहास पुढे येण्याची गरज आहे. मुस्लीम आर्थिक तत्वज्ञान आणि डाव्या विचारांमध्ये द्वंद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मराठीतून लिखाण करून या सर्व सामाजिक मुद्दयांना पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘
कलीम अझीम म्हणाले, ‘ तिहेरी तलाक बद्दल खूप बोलले गेले , पण, प्रश्न जिथे होते, तिथेच आहेत. म्हणून पुस्तकातून लेखन करण्यात आले आहे. उत्तरेतील मुस्लीम शासकां संदर्भात लिखाण खूप झाले आहे, पण,दक्षीणेतील मुस्लीम शासकांबद्दल लिहिले जात नाही.मुस्लीमांचे मुद्दे आले की, तुच्छतादर्शक मते मांडली जातात. इस्लामी प्रथांचे विकृतीकरण करुन मांडले जाते. मुस्लीमेतर घटस्फोटांचे प्रमाण ६८ टक्के आहे, मुस्लीमांमधील घटस्फोटांचे प्रमाण २३ टक्के आहे. पण,चर्चा तलाकची अधिक केली जाते”.
संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
जांबुवंत मनोहर ( राज्य संघटक, युक्रांद ) यांनी प्रास्ताविक केले.
सभागृहात सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल ,येशू पाटील (शब्द पब्लिकेशन, मुंबई),नीलेश पाष्टे, (डायमंड पब्लिकेशन, पुणे), सचिन पांडुळे, सुदर्शन चखाले उपस्थित होते.