आळंदी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन
पुणे:आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्याची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला.
यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात इंद्रायणी नदी च्या घाटावर सकाळी ठीक ९ वाजता झाली. सर्वप्रथम रक्षा विसर्जन स्तंभास निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आळंदी नगरपालिकेच्या वतीने किशोर तरकसे ,आळंदी काँग्रेस कमिटीच्या वतीने नंदकुमार वडगावकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे सचिव अन्वर राजन, पदाधिकारी,कर्मचारी, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, दत्तात्रय सोनटक्के, शितल जाधव इतर पदाधिकारी, कर्मचारी तसेच देवराम घुंडरे, गणपत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संलग्न कस्तुबा आदीवासी ज्ञानसेवा मंडळ संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी सुध्दा यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वधर्म प्रार्थना आणि गांधींच्या प्रिय भजनांनी झाली.
सौ. शुभांगी मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना व भजनांचे गायन केले.कार्यक्रमाचे व निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी अहिंसा, सत्य, सर्वधर्म, समानता आणि संतांची शिकवण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या द्वेषमुलक वातावरणात महात्मा गांधी यांचे विचार समाजाला तारु शकतील असे सांगितले. त्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.