धमक्यांना न जुमानता गांधी पुण्यतिथी दिवशी गांधी भवन येथे जाहीर सभा
एनआर सी विरोधी ठराव महाराष्ट्र विधानसभेने करावा : डॉ.कुमार सप्तर्षी
पुणे ः
‘सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन ‘ या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित सभेला ३० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन, कोथरूड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. बिशप थॉमस डाबरे,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या शांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
‘३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. सद्यस्थितीत त्यांच्या विचारांचे स्मरण करणे, हा या सभेचा हेतू होता. नागरीक नोंदणी रजिस्टर ( एनआरसी ), सीएए, एनपीआर वरून निर्माण झालेली देशातील अस्थिर परिस्थिती सामान्य होण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांचा आश्रय घेणे हा एकमेव मार्ग आहे. या विचारातून आपण समस्तांनी गांधींजींचे स्मरण करणे आवश्यक आहे, म्हणून गांधी विचार प्रेमी समस्त नागरिकांना निमंत्रित करण्यात आले’, असे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.
केंद्र सरकारला पुन्हा जनादेश मागा: डॉ. कुमार सप्तर्षी
डॉ. कुमार सप्तर्षी पुढे म्हणाले, ‘सरकार आपल्याला कागद मागत असेल तर आपण त्यांना मध्यावधी निवडणूक घेवून जनादेशाचा कागद मागा. ज्यांना अक्कल नसते ते नक्कल करतात, हे हिटलरची नक्कल करीत आहेत. हिटलरला आत्महत्या करावी लागली आणि राख झाली.40 कोटी लोक या कायद्यामुळे देशोधडीला लागतील. हा लढा केवळ मुस्लिमांचा नाही, सर्वांचा आहे, तो बंधुतेने लढला पाहिजे. आमची सभा होवू न देण्याची धमकी हा वेडेपणा होता. वेड्याना सत्तेपासून दूर केले पाहिजे. राज्य सरकार बदलले तरी पोलिसांची कार्यशैली बदलली पाहिजे. सभेत हिंसा होऊ नये, याची जबाबदारी गांधी भवन ने घ्यावी, असे पोलिसांनी पत्र देणे हा हास्यास्पद आहे.
नागरिकांनी सीएए, एनआरसी विरोधी पत्रे सरकारला लिहिली पाहिजेत. एनआरसी लागू करणार नाही, हा महाराष्ट्र विधानसभेने ठराव केला पाहिजे.
‘ सत्याग्रही ‘ मासिकाच्या नागरिकत्व कायदा आणि 29 व्या वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन ,’तर एन आर सी’ या शेखर सोनाळकर लिखित पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
धार्मिक भेदाभेद मान्य नाही: बिशप थॉमस डाबरे
बिशप डाबरे म्हणाले, ‘ गांधी विचार हा चमत्कार आहे. भारतीय समाजाला मिळालेले वरदान आहे.क्षमाशीलता हेच त्यांचे जीवन होते. मी महात्मा गांधी यांचा अनुयायी आहे, याचा अभिमान वाटतो. अहिंसा, त्याग ही अंतिम मूल्ये आम्ही मानतो. धार्मिक भेदाभेद, पक्षपात आम्हाला मान्य नाही. भारत हा सर्वांचा आहे. राष्ट्र हे कुटुंब आहे. ही आमची भूमिका आहे. सामंजस्य, सलोख्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. ‘
अशांतता निर्माण करण्यासाठी नागरिकत्व कायदा: तीस्ता सेटलवाड
तीस्ता सेटलवाड म्हणाल्या, ‘ धर्मनिरपेक्ष भारत, लोकशाही या गोष्टी गांधीजींना मारणाऱ्यां हिंदुत्ववाद्यांना मंजूर नाहीत. पण, सर्व घटकांनी एकत्र असण्याने देश मजबूत राहणार आहे. नागरिकत्वाला कोणीच काही कागद असणे, नसण्यावर तोलू शकत नाही.आज गांधीजी असते तर त्यांनी विभाजनवादी कायद्यांना विरोध केला असता. कागदपत्रांच्या आडून जमिनी मोकळया करणे , हडप करून अडाणी सारख्या उद्योगपतींना देणे, हाही कट सीएए, एनआरसी, एनपीआर आणण्यामागे आहे. सर्व आघाडयांवर केंद्र सरकार अयशस्वी ठरल्याने अशांतता निर्माण करुन राज्य करण्यात सरकार मश्गूल आहे.
नागरिकत्व कायद्याच्या वणव्यात शांत बसू नका : उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘ पुण्यातला हा माझा पहिलाच सामाजिक कार्यक्रम आहे. महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा आपण भाग आहोत, हा अभिमानाचा भाग आहे. घोषणाबाजी करणाऱ्यांनाही गांधीजींना अभिवादन करायला राजघाटावर जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.भारतीयता सर्वांच्या नसानसात आहे. सी ए ए हा रौलेट अॅक्टसारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरीबांच्या विरोधात आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा वणवा सुरु असताना शांत राहून चालणार नाही.आपला देशच आपल्याला ओळखू येणार नाही, इतका बदलू देऊ नका. अहिंसेविरुद्ध काहीही चालू देऊ नका.केवळ संसद म्हणजे देश नाही. नागरिक म्हणजे देश आहे, हे या कायद्याच्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. ‘
महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी दरवर्षीप्रमाणे गांधी भवन येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत गांधी आश्रमातील प्रार्थना झाली. सायंकाळी साडेचार वाजता मिनी थिएटरमध्ये ‘ ३० जानेवारी १९४८ ‘ हा माहिती पट दाखवला गेला. ५ वाजून १८ मिनिटांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिवसभर महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होती.
सभेपूर्वी घुटमळणाऱ्या काही हिंदुत्ववादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतली. यावेळी घोषणाबाजी झाली. सीएए विरोधी सभा घेऊ नये म्हणून दिवसभर धमक्यांचे फोन संयोजकांना येत होते.