जाती अंताबाबत अद्याप देशाचा निर्धार झालेला नाही : डॉ.बाबा आढाव यांची खंत
पुणे:
‘ जाती अंताबद्दल तळमळीने सगळे बोलत असताना बदल का होत नाही, याचा विचार केला पाहिजे. जात ही मानसिकता आहे.
जुन्या कर्म सिध्दांतांची हमाली करणे आम्हि सोडत नाही. या देशाने तसा निर्धारच केला नाही, ‘ अशी खंत आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आज व्यक्त केली.
‘सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी उत्सव समिती’ आणि स्व. ताराबाई तुळशीराम तांबे प्रतिष्ठान तर्फे
आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती-जमाती सलोखा परिषदेत ते बोलत होते.
ही परिषद क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह,महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केट, पुणे येथे सोमवार,१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झाली.
डॉ बाबा आढाव यांचा अंकल सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एम. डी. शेवाळे,वसंतराव साळवे,डॉ. विवेक क्षीरसागर,मिलींद गायकवाड,अॅड.विठ्ठल सोनवणे, रवींद्र माळवदकर,प्रा.प्रतिमा परदेशी,प्रल्हाद सोनवणे,राहुल पोकळे,दिलीप कुसाळे, अॅड. शैलजा मोळक, बी. बी. भोसले,कोमल रामदास गाडेकर सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव या परिषदेत करण्यात आला.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘ जाती अंताबद्दल तळमळीने सगळे बोलत असताना बदल का होत नाही, याचा विचार केला पाहिजे. जात ही मानसिकता आहे. पाप – पुण्य, जुना जन्म अशा चिकित्सेला आजही नकार दिला जातो. आपण राजकीय सोयीनुसार वागत आहोत. लोकप्रतिनिधी घटनेवर हात ठेवून शपथ घेत नाहीत. जुन्या कर्म सिध्दांतांची हमाली करणे आम्हि सोडत नाही. या देशाने तसा निर्धारच केला नाही.
संत,विद्रोही निर्माण झाला की जात त्याला आत घेते.जाती अंताचा लढा होताना फाटाफूट होताना दिसते आहे. राममंदिर, शबरी मला प्रकरणी निर्णय घेताना न्यायालये श्रध्दा, परंपरा मानतात, हे चिंताजनक आहे. जात परंपरेवर शिक्षणात काहीच प्रबोधनात्मक सांगीतले जात नाही.
संविधानातील मूल्ये जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
डॉ शरद गायकवाड म्हणाले, ‘समताधिष्ठित समाजासाठी बुध्द , चार्वाक, तंट्या भिल्ल, डॉ.आंबेडकर, पेरियार, अण्णाभाऊ साठे अशा अनेकांचे योगदान लाभलेले आहे. अण्णा भाऊंचे व्यक्तिमत्व सर्वव्यापी होते. वंचितांच्या कल्याणासाठी त्यांनी जीवन वेचले. लेखकराव होण्यासाठी साहित्य लिहिले नाही. बुडणाऱ्या बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी लेखणी उचलली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांपेक्षा अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी, लोकनाट्याचे दौरे अधिक होत होते. पाव शतक त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात अधिराज्य गाजवले. अण्णा भाऊंनी देव, धर्म, आत्मा, परमात्मा यावर न लिहिता श्रमिकांवर लिखाण केले. म्हणून,अण्णा भाऊंचे नाव घेऊन आपण अमावास्या, पौर्णिमा, उपवास, लिंबू – मिरची प्रथा , अंधश्रद्धा बाळगता कामा नयेत. रोटी बेटी व्यवहार करताना जात पाहणे, योग्य होणार नाही.गोवा, महाराष्ट्र निर्मितीत,
हैद्राबाद मुक्ती संग्रामात ते आघाडीवर होते. जग बदलण्याची ऊर्मी त्यांच्यात होती.त्यांना जाती जमातीत अडकवणे योग्य ठरणार नाही. मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडले पाहिजे. पुढे येण्याचा, परिवर्तनाचा मार्ग पकडला पाहिजे.
‘सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी उत्सव समिती’ आणि स्व. ताराबाई तुळशीराम तांबे प्रतिष्ठान तर्फे
आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती-जमाती सलोखा परिषदेला सोमवार सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली. या परिषदेत समताधिष्ठ समाजनिर्मितीसाठी कार्यरत १३ सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल(यादवराव) सोनवणे हे या परिषदे च्या अध्यक्ष स्थानी होते. डॉ. शरद गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी उत्सव समितीचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी स्वागत केले.महादेव खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.