‘ग्रामीण भागाच्या सर्वांगीण, शाश्वत परिवर्तनाकडे लक्ष देण्याची गरज’
पुणे :‘रोजगार निर्मिती, कौशल्य विकसनातून ग्रामीण भागातील सर्वांगीण परिवर्तनाकडे लक्ष देण्याची आणि नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ता कमी आहे असे मानायचे कारण नाही’ असा सूर आज ‘स्टार्स फोरम’ या परिषदेत उमटला.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त व्यावसायिक कौशल्ये वाढीस लागावीत या उद्देशाने ‘स्टार्स फोरम’ (स्किल्स ट्रेनिंग फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ रुरल सोसायटीज फोरम’) च्या वतीने आयोजित देशातील स्वयंसेवी संस्थांसाठी दहाव्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले.
डॉ.सुधीर प्रभू (अमेरिका), ‘ बाएफ ‘ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहनी, युवा परिवर्तन संस्थेच्या मृणालिनी खेर, डॉ. योगेश कुलकर्णी (अध्यक्ष, स्टार्स फोरम) क्षमा म्हेत्रे , डॉ.राजश्री जोशी ( बाएएफच्या कार्यक्रम अधिकारी ) यांच्या उपस्थितीत हे उद्वाटन झाले. डॉ. चैतन्य नाडकर्णी (कार्यकारी संचालक, स्टार्स फोरम) यांनी प्रास्ताविक केले.
उद्घाटनपर पहिल्या सत्रात ‘ग्रामीण भारतातील कौशल्ये प्रशिक्षणाचे प्रयोग ‘ या विषयावर चर्चासत्र झाले .’बाएफ’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश सोहनी ,’युवा परिवर्तन ‘ संस्थेच्या सह संस्थापक मृणालिनी खेर, राजीव गांधी सायन्स -टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव अनिल मणेकर,’कॉर्ड ‘ संस्थेच्या संचालक डॉ .क्षमा म्हेत्रे , डॉ. राजश्री जोशी या चर्चासत्रात सहभागी झाल्या .
या परिषदेच्या दोन दिवसातील चर्चासत्रात आर .श्रीधर,लक्ष्मीकांत माळवदकर,डॉ रघुराम दास ,प्रवीण महाजन ,वैभव काळे ,सुभाष देशपांडे,अजय कुमार ,डॉ संदीप देशमुख ,पंकज सिंह ,डॉ. दिनेश अवस्थी ,अमीर सुलतान ,कुलभूषण बिरनाळे,नरेंद्र कराळे,डॉ सुधा कोठारी ,विवेक सावंत ,डॉ उन्नत पंडित ,रोहित सरोज ,हेमंत गाडगीळ ,रिटा सेनगुप्ता सहभागी झाले आहेत .
ही दोन दिवसीय परिषद ‘ बाएफ संस्था ‘ ( वारजे ) येथे सुरू झाली असून, यात देशभरातून 150 स्वयंसेवी, सामाजिक संस्था, कंपन्या, शासकीय अधिकारी सहभागी झाले आहेत.
स्वयंसेवी संस्था एकत्र येवून अशा एकमेकांच्या चांगल्या नाविन्यपूर्ण गोष्टींची आदानप्रदान करू लागल्या तर त्यांचा या गोष्टी शोधण्याचा वेळ आणि श्रम वाचू शकतील. त्यातून विकासाची गती वाढू शकेल. अशा आदान प्रदानासाठी सामुहिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
डॉ. सुधीर प्रभू यांनी स्टार्स फोरम च्या माध्यमातून ग्रामीण भागातील जीवनोन्नतीसाठी संघटन, प्रशिक्षण, अॅडव्होकसी असे प्रयत्न ‘स्टार्स फोरम’च्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले.
‘ बाएफ ‘ संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश सोहनी म्हणाले,”फक्त नोकऱ्या मिळाव्यात हा कौशल्य प्रशिक्षणाचा हेतू नाही, शाश्वत उपजीविका ग्रामीण भागात उभी राहिली पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हवामान बदल आणि बदलत्या जगात उपजीविकेची पारंपारिक साधने बदलणार आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण बदलावे लागणार आहे.
‘ युवा परिवर्तन ‘ संस्थेच्या मृणालिनी खेर म्हणाल्या, ‘ ग्रामीण भागात युवकांचे रोजगाराचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. शिक्षण, रोजगार, विवाह असे जीवनातील प्रश्न गहन झाले आहेत.
मणेकर यांनी ग्रामीण उपजीविकेसाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचे योगदान कसे असू शकते, यावर मार्गदर्शन केले.
डॉ योगेश कुलकर्णी म्हणाले’ग्रामीण भागातील युवकांच्या आकांक्षा बदलत आहेत. काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला काम मिळू शकते. पण, ते करण्याची मानसिकता आहे का, हा प्रश्न आहे.
शालेय वयात कौशल्ये प्रशिक्षण देणे आणि प्रश्नांची सोडवणूक करायला शिकवणे, हे महत्वाचे ठरेल. शिक्षणाच्या गळतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
परिषदेच्या दिनांक ७ डिसेंबर रोजी दुसर्या दिवशीच्या सत्रामध्ये ‘मेक इन रुरल इंडिया’, ‘रोल ऑफ सीएसआर’,’ आंत्रप्रुनरशीप इन रुरल इंडिया ‘ आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या राष्ट्रीय परिषदेत ‘बाएफ’ ही संस्था यजमान संस्था म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.