पुणे-महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोंढवा-एनआयबीएम परिसरातील पाणीपुरवठ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर, सभागृहातील अनेक वरिष्ठ सदस्यांना हस्तक्षेप करून ही भांडणे मिटवावी लागली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सुरू होताच, एनआयबीएम परिसरातील ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका नंदा लोणकर यांनी या परिसरातील पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणीप्रश्नासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असताना ,आयत्यावेळी कामाचे श्रेय लाटण्याच्या दृष्टीने काही बाहेरचे नागरिक येऊन स्थानिक नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवित असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या याच वाक्याला मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी हरकत घेतली. ‘बाहेरचे कोणाला म्हणता? तुमच्या नावावर सात-बारा करून दिला आहे का,’ अशी विचारणा केली. या वेळी लोणकर यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही, त्यामुळे मोरे यांनी हरकत घेण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडत ‘राष्ट्रवादी’च्या काही नगरसेवकांनी लोणकर यांचे समर्थन केले. त्यानंतर, पाण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असताना आता नागरिकांना दाखविण्यासाठी ‘भूख हडताल’ करण्याचे कारणच काय, अशी विचारणा त्यांनी केली.लोणकर यांच्या या संदर्भाने वसंत मोरे पुन्हा आक्रमक झाले आणि शहरात कोठेही आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, पाण्यासाठी आंदोलन करावे लागते म्हणजेच तुम्ही नाकर्ते आहात, असा पलटवार मोरे यांनी केला.
‘चमकोगिरी ‘
लोणकर आणि मोरे यांच्यातील खडाजंगी रोखण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही प्रयत्न केला. तुम्ही वाद मिटविले नाहीत, तर थेट कार्यपत्रिकेवरील विषय सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील, असे त्यांनी बजावले. तरीही, हे भांडण मिटले नाही. उलट, आंदोलनासाठी चमकोगिरी करू नका, असा टोला लोणकर यांनी मोरे यांना लगाविला. ‘संपूर्ण प्रभागात चमकोगिरी कोण करतेय हे सर्वांना माहिती आहे. एकाच तिकीटात दोन जणांची चमकोगिरी चालते,’ असे प्रत्युत्तर मोरे यांनी दिले. त्यावरून, आणखी वादावादी सुरू झाली. अखेर, सभागृहातील सर्व वरिष्ठ सदस्यांनी हस्तक्षेप करून दोघांनाही शांत केले.