बेकायदेशीर माथाडींवर कारवाई करू – सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांचा व्यापाऱ्यांना विश्वास
पुणे : माथाडी कायदा हा व्यापारी व कामगार अशा दोन्ही घटकांच्या फायद्याचा आहे. परंतु, सध्या शहरामध्ये माथाडीच्या बेकायदेशीर संघटना स्थापन होत असून त्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे व त्यांच्याकडून दम देऊन पैसे उकळण्याचे काम करीत आहेत, व्यापाऱ्यांनी अशा बेकायदेशीर माथाडींना घाबरण्याचे कारण नसून अशा घटना घडल्यास पोलीस व कामगार आयुक्तालयाकडे तत्काळ तक्रार करावी. आम्ही अशा बेकायदेशीर माथाडींवर कडक कायदेशीर करु, असा विश्वास सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी आज व्यापाऱ्यांना दिला.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने पूर्व भागातील व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राऊत यांनी माथाडी कायद्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, वानवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुंडे, माथाडी मंडळाचे सचिव सुरेश साळुंखे, कामगार अधिकारी श्रीकांत चोबे, व्यापारी संघाचे नवनाथ सोमसे, देवेंद्र सारडा, सुनील गेहलोत, महेंद्र लुनीया, दयाराम कुमावत, शेषाराम देवासी आदी मान्यवर व व्यापारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी त्यांना त्रास देणाऱ्यांची तक्रार करण्यास अजिबात घाबरु नये. पोलीस समाजकंटकांवर कारवाई करण्यास कधीही मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे खंडणी मागणारे, वर्गणीच्या नावाखाली त्रास देणारे, धमकी देणारे अशांविरुद्ध लगेच तक्रार द्यावी. पोलीस शंभर टक्के सत्याच्या बाजुने उभा राहतील आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांना माथाडी कायद्याची माहिती नाही. पोलिसांसंदर्भात व्यापाऱ्यांमध्ये एकप्रकारची भिती वाटते. त्यामुळे व्यापारी त्रास सहन करीत राहतात. परंतु, वास्तवामध्ये पोलीस व माथाडी विभागाकडून व्यापाऱ्यांना खूप सहकार्य होत असते. गरज असते ती, व्यापाऱ्यांनी पुढे येऊन त्यांना त्रास देणाऱ्यांची तक्रार देण्याची. त्यामुळेच व्यापाऱ्यांना याबाबतीत मार्गदर्शन व्हावे म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली होती, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. प्रश्न अथवा समस्या आल्यावरच व्यापारी जागा होतो. तसे न होता सदैव व्यापाऱ्यांनी एकत्र व एकजुटीने राहिले पाहिजे, असे वानवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुंडे यांनी सांगितले.