पुणे-महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ५२ आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की सर्वतोपरी काळजी घ्या आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी सगळ्या सूचनांचं काटेकोर पालन करा असंही सांगितलं आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. मात्र आवाहन करुनही गर्दी टळली नाही तर मात्र ते बंद करावं लागेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच ३१ मार्च नाही तर पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे असेल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केेलं.
रोज विभागीय आयुक्त पत्रकार परिषद घेतात. आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला त्यामुळे आज मी पत्रकार परिषद घेतो आहे आणि तुम्हाला माहिती देतो आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय चंदनवाले, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना ते म्हणाले, काही कंपन्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे मात्र माणूस गमावण्यापेक्षा आर्थिक नुकसान परवडलं त्यामुळे कंपन्यांनी सहकार्य करावं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढचे १५ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने इच्छाशक्ती दाखवून घरी राहिलं पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीही अफवा पसरवू नका असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. केंद्राला सध्या निधी मागण्याचं कारण नाही. करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी आहे. लोकांनी गर्दी करणं टाळावं. आपली काळजी आपण घ्यावी त्याची सुरुवात स्वतःपासून करावी असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.लग्न समारंभही पुढे ढकला. अगदीच शक्य नसेल तर मुलाकडचे आणि मुलीकडचे असे २५ लोक मिळून ते लग्न पा पाडा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. इतकंच नाही तर दहावा, तेरावा असेल तर तिथेही लोक गर्दी करतात. तिथेही गर्दी करु नका असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. आपल्या देशाला संकट नवीन नाही, या संकटातूनही आपण बाहेर पडू, या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे सांगून ते म्हणाले, लग्न समारंभाबरोबरच अन्य कार्यक्रमांचे विधीही कमीत कमी व्यक्तींमध्ये साजरे करावेत.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांसाठी तसेच साहित्य खरेदीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेतून 5 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत. तसेच या परिस्थितीत आवश्यक साहित्य खरेदीचे निर्बंध वित्त विभागाने शिथील केले आहेत. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत आहे. सद्यपरिस्थितीतील प्रादूर्भाव पाहता ३१ मार्च पर्यंत लागू असणारे हे आदेश पुढील आदेश होईपर्यंत सुरु राहतील. रुग्णसेवेत असणा-या डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडू नये, याचा विचार करुन पर्यायी डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीसांच्या मदतीला होमगार्ड उपलब्ध करुन दिले जातील.
या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा, वीज, पाणी पुरवठा होण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने केले असून अन्नधान्याचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णालयेही आवश्यक त्या सुविधेसह तयार आहेत. या परिस्थितीत आरोग्य सेवेबरोबरच अत्यावश्यक सुविधा पुरविणा-या कर्मचा-यांचे कौतुक करुन गर्दी टाळण्यासाठी २५ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु ठेवावीत, अशा सूचना प्रशासनाला केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना गतीने करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, असे त्यांनी सांगितले.