मुंबई(शरद लोणकर )- महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि राज्यमंत्र्यामध्ये कामकाजाचे वाटप अद्याप ठरलेले नसले,तरी मंत्री अमित देशमुख आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील( यड्रावकर) यांच्या कामकाजाचे वाटप मात्र सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून टाकले आहे.त्यामुळे अनेक दिवसांपासून राज्यमंत्री कार्यालयात निर्णया अभावी विभागाच्या अनेक फाईली पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवून चार महिने झाले तरी मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना कोणते अधिकार दयावेत, यावर सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षाच्या प्रमुखांनी अद्याप ठरविलेले नाही.त्यामुळे सध्या राज्यमंत्र्यामध्ये जोरदार कुरबुरी सुरू आहे.
पण सांस्कृतिक कार्य खात्यातील “कार्यक्षम” अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व फाईली सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री पाटील(यड्रावकर ) यांच्या मार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठविण्याचा परस्पर निर्णय घेतला असल्याने याबाबत देशमुख यांचे कार्यालय अनभिज्ञ असल्याचे समजते.
आज दहा बारा दिवसापासून संबंधित अधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री यांच्याकडे विविध फाईली पाठविण्यास सुरुवात केली आहे.परंतु यावर काय निर्णय घ्यावा.या निर्णयाप्रत राज्यमंत्री यांचे कार्यालय आले नसल्याने अनेक फाईली तशाच पडून आहेत. मात्र यामुळे निर्णय घेण्यासाठी देशमुख यांचे कार्यालय फाईली येण्याची वाट पहात बसले आहे.
मुळात अद्याप राज्यमंत्री यांना काय अधिकार दयावा, यावर सरकारचा धोरणात्मक निर्णय झालेले नसताना,सांस्कृतिक कार्य खात्यातील अधिकारी प्रत्येक फाईल/प्रस्ताव राज्यमंत्र्याना का मार्क करतात, असा प्रश्न सध्या विभागात चर्चेला जात आहे.त्यामूळे अनेक विषय मार्गी लागत नसल्याचे विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या विभागाला सध्या दोन्ही मंत्री नवीन आहे.तसेच त्यांनीं घेतलेला कार्यालय स्टाफ हा सुद्धा नवीन असल्याने या विभागात चांगलाच सावळा गोंधळ उडालेला आहे.मात्र याचा पुरेपूर फायदा विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला असून याचा परिणाम मात्र पुढे सांस्कृतिक क्ष्रेत्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही