नवी दिल्ली – संजय राऊत यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा विरोध केला. राज्यसभेतील चर्चेवेळी त्यांनी हा विरोध दर्शवला. यावेळी ते म्हणाले की, “आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र घेण्याची काहीही आवश्यकता नाही. आम्ही किती कठोर हिंदू आहोत याचे प्रमाणपत्र आमच्याकडे नाही. पण तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्याचे हेडमास्तर आम्ही आहोत आणि आमच्या शाळेचे हेडमास्तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, अटल बिहारी वाजपेयी होते. श्यामप्रसाद मुखर्जीही होते.” असे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केले. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत चर्चा करताना राऊतांनी हे वक्तव्य केले. देशात अनेक ठिकाणी नागरिकता सुधारणा विधेयकाचा विरोध होत आहे. जे विरोध करत आहेत ते सुद्धा देशाचे नागरिक आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “लोकशाहीत वेगवेगळा आवाज असतो. जो व्यक्ती या विधेयकाच्या सोबत नाही. तो देशद्रोही आहे आणि जो सोबत आहे तो देशभक्त आहे. हे पाकिस्तानचे सदन नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. देशातील जनतेने सर्वांना मतदान केले आहे. जर पाकिस्तानची भाषा तुम्हाला आवडत नसेल, तर पाकिस्तानला संपवा. त्याबाबत आम्ही तुमच्यासोबत आहोत.”
संजय राऊत म्हणाले की, “जर एखाद्यावर अन्याय होत असेल, तर तुम्ही खंबीर आहात. त्याची साथ द्या. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढले पाहिजे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे. ती लाखो-करोडो लोक आपल्याकडे येत आहेत. मग त्यांना आपण मतदानाचा अधिकार द्यायचा का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.”