पुणे : “शैक्षणिक पदवी मिळवणे हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु यशस्वी होण्यासाठी केवळ पदव्या पुरेश्या नाहीत. तुमची कठोर मेहनत घेण्याची क्षमता, सचोटी आणि प्रामाणिकपणाच तुमची खरी ओळख आहे. यशप्राप्तीसाठी हे गुण आपल्या अंगी असायला हवेत,” असे प्रतिपादन कॅनरा बँकेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक आणि विभागप्रमुख संदीप गवारे यांनी केले.
कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित ‘एमआयटी’च्या बीबीए विद्याशाखेचा पदवीप्रदान सोहळा नुकताच त्यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी स्किमरसल इंडियाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सागर भोसले, ‘एमआयटी’चे प्राचार्य डॉ. रवीकुमार चिटणीस, सल्लागार डॉ. परशुरामन, प्रा. डॉ. अंजली साने, प्रा. सुमिता जोशी, प्रा. विनया निंबोळकर आदी उपस्थित होते.
सागर भोसले म्हणाले, “तुमच्याकडे क्षमता आणि योग्य कौशल्य असतील तर बाजारात तुमच्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकलात; त्याचा उपयोग तुम्हाला नोकरी किंवा पुढील पदवी मिळवून देऊ शकते. परंतु तुम्हाला स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत आणि नवीन गोष्टी शिकत राहिल्या पाहिजेत.”
विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जात असतील, तर अशावेळी शिक्षकांना कठोर व्हावे लागते. पण त्यामागे विद्यार्थ्यांचेच हित असते. कुणाला कमी कुणाला जास्त गुण मिळाले असले, तरी सर्वांचेच समाजाला होणारे योगदान सारखेच आणि तितकेच महत्वाचे असणार आहे. जगात भारताला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, असे प्रा. डॉ. रवीकुमार चिटणीस यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.
यशप्राप्तीसाठी मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा गरजेचा- संदीप गवारे
एमआयटी’च्या बीबीए विद्याशाखेचा पदवीप्रदान समारंभ