पुणे :- जगातून धर्मांधता, अस्पृश्यतेची भावना, पंथ भेद, स्वधर्म अहंकार नष्ट होऊन, बंधूभाव निर्माण व्हावा हीच खरी ईश्वरीय अनुभूती आहे. कोठेही हाहा:कार माजू नये. वाईट मनोवृत्तीचे निर्मूलन व्हावे. भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मसमभावाच्या आणि आधुनिक मूल्यांची जोपासना करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान यांनी केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, एमआइटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिजाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे काश्मीर येथील थोर विचारवंत आणि माजी केंद्रिय मंत्री पद्मविभूषण डॉ. करण सिंग यांना ‘तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्ञानेश्वर माऊली यांची सुवर्ण जडीत प्रतिमा, सुवर्ण पदक, सन्मानपत्र आणि सव्वा पाच लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, जेष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रकाश वैदिक, आत्मसंतुलन व्हिलेजचे सदगुरू डॉ. बालाजी तांबे, शिक्षणतज्ञ रितू सिंग, स्वामी चिदानंद सरस्वती, डिव्हाईन शक्ति फाउडेशनच्या साध्वी भगवती सरस्वती, डॉ. राजीव शारदा, आयसीसीटीच्या डॉ. आनामिक वडेरा, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्युपीयुचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस. परशूरामन व एमआयटी एडीटी युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. सुनील राय हे उपस्थित होते.
डॉ. अरिफ मोहम्मद खान म्हणाले, भारताला प्राचीन संस्कृती आहे. आज जगात सर्वात युवा देश म्हणून देशाची ओळख आहे. आध्यात्मिक अध्यासन आणि ईश्वरी तत्वज्ञानाचे आचरणातूनच शिक्षण मिळेल. भारत हा ऋषीमुनिंचा देश म्हणून ओळखला जातो. येथील ऋषीमुनींनी केवळ भौतिक बाबींचे अध्ययन केले नसून त्यांनी आंतरिक मनाच्या ज्ञानाचे अध्ययन केले आणि शिकवले. ईश्वरीय अनुभूती प्रत्येक जीवाबरोबर असते, त्याला विद्यावान म्हणतात. प्रत्येक व्यक्तिची मदत करणे, सर्वांचा आदारसन्मान राखने आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करने हीच ईश्वरीय अनुभूतीची प्राप्ती आहे. श्री रामाने लक्ष्मणला वनवासाला जाताना शिक्षण दिले होते की, आमचा केवळ आत्मा आहे, शरीर नाही. ऋषीमुनींयांनी भारतीय संस्कृतीला जतन केले आहे. ज्ञान आणि शिक्षण महत्वाचे आहे.
डॉ. करणसिंग म्हणाले, भगवद् गीतेच्या माध्यमातून जगाला शाश्वत विकास आणि आध्यात्माचे ज्ञान दिले गेले. गीता हे संघर्षशास्त्र आहे. गुरू आणि शिष्याचे नाते हे भारतीय शास्त्र शिकवतात. मित्रत्वासाठी कोणत्याही प्रकारचे अडथळे नसावे. चांगले कर्म करत असताना ते ईश्वर चरणी ठेऊन समर्पित भावनेने करत राहवे. तुम्ही काहीही चुकीचे केले, तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. ज्ञानाने आणि भक्तीने कर्मयोगी, धर्मयोगी आणि राजयोगी व्हावे. यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावे. विद्या, धन, राजकारण, मोहमाया यापासून परावृत्त व्हावे, असे वाटत असेल तर ईश्वरभक्तीत लीन व्हावे. सध्याच्या सोशल माध्यामातील गोंगाटामुळे आत्मिक विचार ऐकू येत नाही.
डॉ. विजय भटकर म्हणाले, चांगल्या विचारांना आत्मसात करण्याची आणि ते अंमलात आणण्याची गरज आहे. मानवता कल्याण हेच विश्वशांतीचे तत्वज्ञान असावे.
डॉ. बालाजी तांबे म्हणाले, विज्ञान, तत्वज्ञान आणि धर्म एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत. यांच्यातील संबंधामुळे मानवतेसाठी कल्याणाची काम होत आहे. मानवतेला युद्धाची गरज नसून विश्वशांतीची आवश्यकता आहे. शांती ही विकासाचे आणि आत्मसमाधानाचे प्रतिक आहे.
डॉ. साध्वी भगवती सरस्वती म्हणाल्या, भारताला देवाचे वरदान मिळाले आहे. अमेरिकेतील एमआयटीत केवळ तंत्रज्ञान शिकवले जाते. येथील एमआयटीत तंत्रज्ञानासोबत जीवन जगण्याचे तत्वज्ञान शिकवले जाते. शिक्षण संस्थांमधून विज्ञान आणि तत्वज्ञानाचे शिक्षण घ्यावे, मात्र जीवनात आध्यात्माला ही विशेष स्थान द्यावे. आध्यात्म योग्य दिशा दाखवू शकते. आध्यात्म हेच खरे ज्ञान आहे.
स्वामी चिंदानंद सरस्वती म्हणाले, या सर्वात मोठ्या घुमटातून जगाला विश्वशांतीची प्रेरणा दिली जाईल. तुकड्या तुकड्यामध्ये जगण्यापेक्षा शांतीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. आध्यात्माचा अर्थ केवळ माळांचा जप नसून यात सर्वांना एकात्मतेत गुंफण्याची गरज आहे.
विश्वनाथ कराड म्हणाले, विश्वशांती आणि मानवता कल्याणासाठीचा संदेश या तीन दिवसीय वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून दिला जाईल. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे दर्शन जगाला देण्याचे कार्य यातून होत आहे. २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन म्हणून जगासमोर येईल.
मंगेश कराड प्रस्ताविकात म्हणाले, संतांनी भारतीय संस्कृती आणि परंपराचे जतन केले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी मानवी कल्याणाचे काम केले. जगात विश्वशांती नांदावी आणि युद्धापासून परावृत्त करावे यासाठी संत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ यांनी विचार मांडले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. परशुरामन यांनी आभार मानले.