- आडत्यांना निर्वाणी चा अखेर चा इशारा
- बोम्बिल मार्केट मासळी मार्केट कड़े शासनाचे दुर्लक्ष
पुणे-
मार्केट यार्डात रविवारी, आजपासून पुन्हा बाजार सुरू होणार असून व्यापार न करणाऱ्या आडत्यांवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. व्यापार न करणाऱ्या आडत्यांचे गाळेच ताब्यात घेण्यात येतील, अशी तंबी बाजार समितीने दिली आहे. एक दिवस भाजीपाला विक्री; तर दुसऱ्या दिवशी कांदे, बटाटे; तसेच फळांची विक्री अशा स्वरूपात एकेका दिवसांच्या अंतराने बाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मार्केट यार्डात रविवारी केवळ पालेभाज्या आणि फळभाज्यांची खरेदी विक्री होणार आहे. सोमवारी कांदे, बटाटे आणि फळांची विक्री होईल. बाजारात विविध राज्यांतून येणाऱ्या शेतीमालाची विक्री व्हावी, पुणेकरांना भाज्या मिळाव्यात; तसेच गर्दी टाळता यावी, यासाठी रविवारी फळभाज्यांची विक्री, सोमवारी कांदा बटाटे व फळांची विक्री असे नियोजन केले आहे. तीनही विभाग एकत्रित सुरू ठेवल्यास मोठी गर्दी होईल. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी अशा पद्धतीने नियोजन केले आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
‘दरम्यान, रविवारी बाजार सुरू होणार असल्याने बहुतांश कामगार; तसेच आडते व्यापार करण्यास तयार झाले आहेत. आज (रविवारी) किती व्यापारी व्यवहार करणार ते कळेल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि बाजार समिती कायद्यान्वये व्यापार न करणाऱ्या आडत्यांचे गाळे ताब्यात घेण्याची कारवाई केली जाईल,’ असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
‘जे व्यापार करण्यास तयार आहेत, अशा दुसऱ्या व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावर गाळे उपलब्ध करून देण्यात येतील. मार्केट यार्डातील व्यापार सुरळीत सुरू होणार असून आडते असोसिएशन आणि काही आडते बाजार बंद असल्याची अफवा पसरवत आहेत. त्यांच्याकडून अशा अफवा पसरविणे चुकीचे आहे. अशा आडत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई केली जाईल. त्यांच्या बंदच्या आवाहनामुळे काही दुष्परिणाम झाल्यास ते स्वतः त्याला जबाबदार राहतील. फेसबुक, व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून बाजार बंद असल्याचे काही जण सांगत आहेत. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा इशारा बाजार समितीने दिला आहे.