विघ्नहर कारखान्याची ३७ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात
विषयपत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांची एकमुखी मंजूरी
जुन्नर /आनंद कांबळे
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बुधवारी (दि.१८) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांनी एकमुखी मंजूरी दिली.
अध्यक्षस्थानावरुन सभासदांना मार्गदर्शन करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी. प्रतिटन रुपये २६८५ इतकी होती. या सिझनमध्ये गळीतास आलेल्या ऊसास संपूर्णपणे एफ.आर.पी पेमेंट कारखान्याने अदा केले असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. आगामी २०१९-२० गाळप हंगामात आपण ८ लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून हंगामाच्या तयारीसाठी कारखान्याने ऊस तोडणी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये ६०० टायर बैलगाडी, २५० ट्रॅक्टर टायरगाडी, ३०० ट्रक / टोळी तसेच ५ ऊस तोडणी यंत्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर को-जनरेशन प्रकल्प व डिस्टीलरी विभागातील देखभाल, दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यामध्ये असून येत्या ऑक्टोबर २०१९ अखेरपर्यन्त कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज होत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस पिकावर हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने विघ्नहरने सुमारे १३ टन भुंगेरे गोळा करुन त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. हुमणी आटोक्यात आणणेसाठी शेतकी विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.
सत्यशिल शेरकर म्हणाले की, केंद्ग सरकारने बफर स्टॉक अनुदान व साखरेवरील निर्यात अनुदान जाहिर केले. परंतू अनुदानाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. निर्यात साखरेचे अनुदान लवकर देणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.सतत मागिल दोन वर्षे साखर उत्पादन जास्त झालेने बाजारभाव कमी होवून शेतकर्यांना देणे अवघड झाले. यावर केंद्ग शासनाने मागिल दोन वर्षे कारखान्यांना सॉफ्टलोनद्वारे पैसे उपलब्ध करुन दिल्यामुळे पूर्ण करता आली. तथापि, याद्वारे मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा कारखान्यांवर निर्माण झाला. सदर कर्जाची परतफेड एक वर्षे मुदतीची असल्याने याचा परिणाम कारखान्यांच्या खेळते भांडवलावर होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. केंद्ग सरकारने साखरेचे किमान विक्री मुल्य ३१००/- रु. केले. याचा फायदा होणे अपेक्षित होते. परंतू देशामध्ये एकच दर ठेवल्याने उत्तर प्रदेश सारख्या राज्याला त्याचा चांगला फायदा झाला. संपूर्ण देशभर उत्तर प्रदेशची साखर जाऊ लागली. व महाराष्ट्रातील साखरेचे साठे आजही पडून आहेत. याचा परिणाम साखरेवरील व्याजाचा बोजा वाढला असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशिल सभासद राहणेसाठी ५ वर्षामधून एकदा गाळपास ऊस घालणे व ५ वर्षामधून एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहाणे अनिवार्य आहे, याबाबत सभासदांस वेळोवेळी नोटीशीद्वारे, अहवालाद्वारे कळविणेत आलेले आहे. सभासद क्रियाशिल नसल्यास त्यांना मिळणार्या अनेक सवलती, सोई-सुविधा व हक्कापासून वंचीत रहावे लागणार आहे. सर्व सभासदांनी याबाबत जागरुक रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सत्यशिल शेरकर म्हणाले की मागिल दोन वर्षांमध्ये सलग साखरेचे बंपर उत्पादन झालेने साखरेचे बाजारभाव देशांर्तगत व आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळले. आपल्या को-जन. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा करार मागीलवर्षी संपला. त्याचा विज खरेदी दर ६.४५ पैसे युनिट होता. तो आज ३.५६ पैस युनिट झाला आहे. त्यामुळे को-जन. युनिटमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले. संचालक मंडळाने नेहमीच ऊस उत्पादक, शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. व यापुढील काळामध्येही घेणार आहे. तथापि, सदरील सर्व बाबींचा विचार करता पेक्षा अधिकचा भाव देणे अवघड आहे. परंतू यामधूनही आपण मार्ग काढून पैशांची उपलब्धता झालेवर आपली दिवाळी नक्कीच गोड करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी विघ्नहरचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन सभेच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे ५ शेतकरी, हंगामात एकरी १११ मे.टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेतलेले १४ शेतकरी, हंगामात एकरी १०० मे.टनाचे पुढे उत्पादन घेतलेले २७ शेतकरी, हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे ४ कंत्राटदार, हंगामात जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे २ कंत्राटदार, हंगामात हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे १ कंत्राटदार यांचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, पुरस्कार व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पारगांव तर्फे आळे येथील ऊस उत्पादक शेतकरी विकास चव्हाण यांना पुणे जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक सभासद शेतकर्यांनी चर्चेत भाग घेवून प्रश्न मांडले. तसेच सुचना केल्या. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी समाधानकारक खुलासा केला. कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी दुःखवट्याचा ठराव मांडला. उपस्थित सभासदांचे आभार व्हाईस चेअरमन अशोकशेठ घोलप यांनी मानले.
कारखान्याच्या ३७ व्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी कारखान्यास हंगाम २०१८-१९ साठीचा नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज, नवि दिल्ली या संस्थेकडून तांत्रिक कार्यक्षमतेचा उच्च साखर उतारा विभागातील संपूर्ण भारत देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सलग तिसर्यांदा मिळाला असून नुकताच भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर उद्योगासाठी काम करणार्या अशा प्रथितयश संस्थेकडून कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ऊस विकासाचे पारितोषिक मिळाले आहे. सदरहू बक्षिस वितरण समारंभ येत्या २१ सप्टेंबर-२०१९ रोजी कोल्हापूर येथे होणार असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी सांगितले. विघ्नहर कारखान्याला मिळालेल्या या दोन्ही पुरस्कारांबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्यावतीने चेअरमन सत्यशिल शेरकर व सर्व संचालक मंडळाचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.