बालवयातच शिवाजी महाराजांचे विचार रुजावेत
पुणे : शाळा महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श गुण समजावून सांगितले पाहिजे आणि त्यांचे विचार रुजवायला हवेत तरच येणारी पिढी चांगल्या विचारांची घडेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार देशात रुजले असते तर आज देशात ज्या विदारक घटना घडत आहेत त्या घडल्या नसत्या, असे प्रतिपादन सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. सोपान जावळे यांनी केले.
येवलेवाडी येथील के जे शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष कल्याण जाधव, बी एस केशव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, विभावरी जाधव, संचालक डॉ. एच. के. अभ्यंकर, डॉ. व्हि. जे.काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. निलेश उके, डॉ. बी. एम शिंदे, डॉ. रवींद्र गडगे, प्रा. गणेश इंगोले, डॉ. संजय चौधरी, प्रा. सुनील घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण प्रसाराचे काम करणाऱ्या हर्षदा देशमुख-जाधव यांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सोपान जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. सोपान जावळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व सामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. आज मात्र प्रत्येकजण स्वःतचाच विचार करतो. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. कारण ते शेतकऱ्यांचे राजे होते. महाराजांनी मावळ्यांना व्यसनापासून, नाच गाण्यापासून दूर ठेवले म्हणून मैलोनमैल प्रवास करून त्यांचे मावळे युद्ध जिंकत होते.”
कल्याण जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करायचा असेल, तर त्यांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर शिक्षेची तरतूद केली होती, त्यामुळे आज जसे महिलांवर अत्याचार होत आहेत तसे होत नव्हते. आपल्या सरकारनेही महिला अत्याचारासंदर्भात कठोर कायदे करायला हवेत.”
नृत्यातून घडले भारतीय एकात्मतेचे दर्शन
विविध प्रकारच्या वेशभूषा, शिवाजींचा पाळणा, लेजीम, शस्त्रपूजन, मर्दानी खेळाचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाने भारतीय संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडले. ‘भारत हम को जान से प्यारा है’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘सून मितवा, सून मितवा’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा दिल मै समा जा’, ‘देश रंगीला, देश रंगीला’ अशा गाण्यावर नृत्य सादरीकरण झाले. शिवाजी महाराजांवरील पोवाड्याने वातावरणात उत्साह भरला. शीख, ख्रिश्चन, पंजाबी, साऊथ इंडियन, महाराष्टीयन वेशभूषाच्या माध्यमातून फॅशन शो सादर झाला.