आशादायी, आर्थिक सुधारणा, समाजहित साधणारा अर्थसंकल्प -केंद्रीय कर आयुक्त कृष्णा मिश्रा
पुणे : “अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प आशादायी, आर्थिक सुधारणेला वाव देणारा आणि समाजहित साधणारा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, कर रचनेतील बदल, टॅक्सपेअर चार्टर, ऑनलाईन कर भरणा, महसूल गळती थांबवण्यासाठी केलेल्या तरतुदी, परताव्या संदर्भातील तरतुदी यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. स्थानिक उद्योग आणि उत्पादकांना दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी अर्थसंकल्पात समाविष्ट आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय मुख्य कर आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.
दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभागाच्या वतीने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विश्लेषण कार्यक्रमात कृष्णा मिश्रा बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील मेरियट हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमावेळी सीए डॉ. गिरीश अहुजा, राज्य कर उपायुक्त संजाली दियास, सीए विक्रम मेहता, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘आयसीएआय’च्या पुणे विभागाच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव समीर लड्ढा, खजिनदार काशिनाथ पठारे, अमृता कुलकर्णी, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए यशवंत कासार यांच्यासह जवळपास ११५० सीए व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कृष्णा मिश्रा म्हणाल्या, “वस्तू व सेवा कर प्रणाली सुकर करण्यासाठी पावले उचलली आहेत. महसुलात गैरप्रकार होऊ नयेत, याकरिता विक्रेत्यांना देयके देणे बंधनकारक आहे. ‘फ्री ट्रेंड अग्रीमेंट’, ‘अँटी डंपिंग ड्युटी’ याबाबतही चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मेक इंडियाला बळ मिळेल. स्थानिक उद्योगांना सक्षम करण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांमध्ये करदात्याच्या दृष्टीने चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. येत्या काळात ऑनलाईन प्रक्रियेमुळे करभरणा, परतावा अधिक सुलभ होईल.”
सीए डॉ. गिरीश अहुजा म्हणाले, “अर्ध्या किंवा एक टक्का फायदा मिळवण्यासाठी काहीजण खोट्या, बोगस पावत्यांचा आधार घेतात. यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होते. अशा लोकांकडून दंड वसूल करायला हवा. आयकर विभागासहित इतर आर्थिक यंत्रणांच्या अत्याधुनिकरणामुळे घोटाळेबाजांची माहिती मिळवणे आता सोप्पे झाले आहे. त्यामुळे करचुकवेगिरीच्या मार्गाला जाऊ नये.”
सीए विक्रम मेहता म्हणाले, ”माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. ‘जीएसटी’ प्रणाली किचकट वाटत असली, तरी तिला सुलभ करण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. करसंकलन वाढल्यास सर्वांनाच फायदा होणार आहे. जीएसटीमधून पळवाटा काढणे, फेक फाईल करणे बेकायदेशीर आहे.”
सीए चंद्रशेखर म्हणाले, “केंद्रीय अर्थसंकल्पात होणारे बदल लक्षात घेऊन इन्स्टिट्यूटच्या वतीने सीए आणि विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबवले जातात. सीए हा देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणारा महत्वाचा घटक असल्याचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटले होते. तो विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वच सीए प्रयत्नशील असतात.”
‘प्रत्यक्ष करांतील तरतुदी’वर सीए डॉ. गिरीश अहुजा, ‘अप्रत्यक्ष करांतील तरतुदी’वर सीए विक्रम मेहता यांनी मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे, सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए समीर लड्ढा यांनी सूत्रसंचालन केले. सीए आनंद जाखोटिया यांनी आभार मानले.