संशोधनाधारित उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे – माजी कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर
पुणे : “परदेशात इनोवेशन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन व विकास यावर आधारित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे त्यांच्या देशाच्या विकासाला हातभार लागतो. तिकडे विदयार्थ्यांना अश्या गोष्टींसाठी नियमितपणे गुंतवून ठेवले जाते. त्यासाठी लागणारा निधी, जागा आवश्यक बाबींची पूर्तता सरकार करते. अश्या प्रकारचा दृष्टिकोन आपल्या सरकारने समोर ठेऊन विदयार्थ्यांना प्रोत्साहित करावे. त्यातून देशाच्या विकासाला गती मिळेल व सर्वच गोष्टीत देश अग्रेसर राहील,” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर यांनी केले.
येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेत ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा त्यांच्या हस्ते झाला. ८०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक कल्याण जाधव, संचालक डॉ. एच. के अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. निलेश उके, डॉ. बी. एम शिंदे, मकरंद पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. बी. पी. बंडगर म्हणाले, “बंदुकीच्या जोरावर, हंटरच्या धाकावर अनेक वाघांना माणसासारखे वागायला लावणारे माणसे पहिली आहेत. परंतु बंदुकीच्या आणि हंटरच्या धाकाशिवाय अनेक माणसाना वाघासारखे जगायला शिकवणारा एकच वाघ म्हणजे शिक्षक असतो. माणूस घडवण्यात शिक्षकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षकांमुळेच देशाला चांगले डॉकटर, इंजिनियर, अधिकारी मिळतात आणि देश व्यवस्थित चालतो.”
कल्याण जाधव म्हणाले, “औदयोगिक संशोधनावर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे आज युरोप आणि अमेरिकन देश प्रगती पथावर आहेत. आपल्याला एखादी अडचण आल्यास आपण लगेच ती गोष्ट थांबवतो ही मानसिकता बदलायला हवी. एखादे कार्य हाती घेतले तर ते प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीने पूर्ण करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी आणि समाजातील सहकार्यांनी इतरांना प्रोत्साहन देणे गरजचे आहे.”
डॉ. एच. के अभ्यंकर म्हणाले, महाविद्यालयाने नेहमीच विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाऊल ठेवले आहे. त्यामुळे आज केजे शिक्षण संस्थेतील विदयार्थी जगभरातील कंपन्यामध्ये विविध मोठया पदावर कार्यरत आहेत. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांनी व्यवसायच्या आणि संशोधनाच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा चव्हाण आणि प्रो. पावसकर यांनी केले. आभार बी. एम. शिंदे यांनी मानले.