कार्यक्रमात गफार मोमीन, राजेश मेहता, रामदास गायकवाड, रविंद्र शाळू, सतीश इंगळे, वंडरबॉय पृथ्वीराज आणि मनीषा निश्चिल या गायकांनी त्यांच्या मधुर स्वरांनी गीतांचे सादरीकरण केले. नीरजा आपटे यांनी निवेदन केले. सईद खान, असिफ अफजल, हार्दिक रावळ, गोविंद कुडाळकर, सचिन वाघमारे , झाकीर शेख, असिफखान इनामदार या वाद्यवृंदाने साथसंगत केली. अमोल कोळेकर यांनी साऊंडचे, तर विजय चेन्नुर लाईट्सचे काम पाहिले.
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांच्या उपस्थितीत रंगलेल्या स्वरमैफिलीने पुणेकर रसिक मंत्रमुग्ध
पुणे : पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही… शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है…दिल देके देखो दिल देके देखो जी दिल लेने वालों दिल देना सीखो जी…छोडो कल की बातें कल की बात पुरानी… जिंदगी प्यार का गीत है… अशा सदाबहार गाण्याच्या स्वरमैफिलीत पुणेकर रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. या अजरामर गीतांना संगीतबद्ध करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांच्या उपस्थितीत रंगलेल्या मैफिलीला स्वरसाज चढला.
निमित्त होते, गेटसेट गो हॉलिडेजेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त गायिका मनीषा निश्चल संचालित ‘महक पुणे’च्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या ख्यातनाम संगीतकार उषा खन्ना आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते जागतिक दर्जाचे कार रॅली ड्रायव्हर संजय टकले यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी उषा खन्ना यांनी संगीतबध्द केलेल्या गाण्यांची ‘जिंदगी प्यार का गीत है’ अशी सुरेल मैफिल रसिक श्रोत्यांना अनुभवता आली. नीरजा आपटे यांनी उषा खन्ना यांचा जीवनप्रवास मुलाखतीतुन उलगडला. उषा यांनी त्यांच्या गेल्या ५० वर्षांच्या सांगीतिक कारकीर्दीतील निरनिराळ्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी गेट सेट गो हॉलिडेजेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. गायिका मनीषा निश्चल, ‘गेट सेट गो’चे अमित कुलकर्णी आणि अस्मि कुलकर्णी उपस्थित होते.
उषा खन्ना म्हणाल्या, ”सुरांची विरासत वडिलांकडून मिळाली. या क्षेत्रात काम करण्यासाठी वयाच्या १७ वर्षी मुंबईत आले. सांगीतिक कारकिर्दीला ५० वर्ष होऊन गेली. महिला संगीतकार म्हणून प्रवास सुरु असताना अनेक आव्हाने आली. परंतु समकालीन संगीत क्षेत्रातील गायक तसेच संगीतकारांनी प्रेम, शुभेच्छा, साह्य मिळत गेले. माझ्यासाठी लताजी गायल्या, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. त्यांना गाताना, ऐकत असताना मंत्रमुग्ध होत असे. आशा भोसले, किशोर कुमार, मन्ना दा या सर्वांसोबत काम केले. प्रत्येकाची आपली अशी खास शैली होती. एखाद्या गाण्यासाठी कोण गाणार आहे, याचा विचार करून धून बनवत असे. रफी साहब हे कधीच रियाजाशिवाय गाणे गात नसत. ही गोष्ट प्रत्येकाने शिकण्यासारखी आहे.”