पुणे : “खादी वस्तूंचे प्रदर्शन पाहून अभिमान वाटतो. त्याकाळी देश बांधणीसाठी महात्मा गांधीनी खादीचा वापर करण्यास सुरुवात केली होती. आपला देश कपड्याच्या व्यवसायात स्वावलंबी असावा, हा यामागे गांधीजीचा विचार होता. आज पुन्हा खादीला चांगले दिवस येताहेत, हे पाहून आनंद वाटतो. आपण प्रत्येकाने खादी वापरण्यावर भर दिला पाहिजे,” असे प्रतिपादन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एसआयएफटी) खादीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वदेशाकडून विदेशाकडे’ संकल्पनेवर आधारित ‘स्पार्क २०२०’ हस्तकला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. यावेळी आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, डॉ. आनंद शेरखाने, राजेश बत्रा, सचिन चोप्रा, गणेश निबे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, ‘एसआयएफटी’च्या संचालिका प्रा. रेणुका घोसपुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून खादीवर आधारित विविध वस्तूंचे प्रदर्शन बावधन येथील ‘सूर्यदत्ता’च्या कॅम्पसमध्ये दि. ९ ते १२ फेब्रुवारी कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खादीच्या विविध वस्तूंचे ३० स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये खादीच्या वस्तू, कपडे, दागिने, लहान बाळांसाठी उबदार कपडे, पाळीव प्राण्यासाठी कपडे आदी वस्तूंचा समावेश आहे.
डॉ. आनंद शेरखाने म्हणाले, “स्वदेशी खादी चळवळ ही व्यापक करत इंग्रजांना पळवून लावण्यात मोठा हात आहे. सध्या खादीचा वापर वाढवणे गरजेचे आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर जास्तीत जास्त केल्यास भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल. अनेकांना रोजगार मिळेल आणि त्यातून हजारो कुटूंब उदरनिर्वाह करतील.”
आचार्य लोकेश मुनी म्हणाले, “खादीच्या प्रोत्साहनासाठी हा जो उपक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेतच स्वदेशी चळवळ सुरू राहील. सुर्यदत्ता प्रतिभावंत व्यक्तींना एकत्र आणत आहे. त्यांच्या माध्यमातून अश्या नवनवीन संकल्पनातून देशहिताच्या उपक्रम राबवत आहेत. यातून सर्वच गोष्टी साध्य होत आहेत.”
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रेरणास्थान बन्सीलालजी चोरडिया यांची १६ वी पुण्यतिथी याचे औचित्य साधून ‘सूर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये विश्वशांती मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ‘स्पार्क २०२०’ या ‘खादी : स्वदेशातून विदेशाकडे’ या संकल्पनेवरील चार दिवसीय प्रदर्शनाच्या निमित्ताने हे शांती मंदिर उभारले असून, महात्मा गांधी यांचे सूत कातताना हलते चित्र, सतत कानावर पडणारे भजन आणि शांततेच्या प्रस्थापनेसाठी भेट देणाऱ्यांना धागा बांधण्यासाठी असलेले ठिकाण यामुळे येथील परिसर भारावून गेला आहे. आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या हे विश्वशांती मंदिर पाहण्यासाठी स्थानिकांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्याचा, थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसेनानी यांची ओळख करून देण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे.”