दुर्गम भागात स्वच्छतागृह उभारण्याचे कार्य कौतुकास्पद -डॉ. कैलास शिंदे
फिनोलेक्स-मुकुल माधव फाउंडेशनकडून आदिवासी भागात ३३२ शौचालयाची निर्मिती
पुणे : “महाबळेश्वरसारखे गाव स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांकावर येते आणि राज्यातील इतर काही गावात स्वच्छतागृहच नाहीत, हा मोठा विरोधाभास आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत, परंतु त्या तळागातील नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे अशी गावे या योजनांपासून वंचित राहतात. गावात स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला, मुली, बालके, वयोवृद्ध व्यक्तींना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. अशावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून ३३२ शौचालये उभारली गेली आहेत. या दुर्गम भागात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे,” अशा शब्दात पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या युवा परिवर्तन संस्थेच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण ३३२ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील पाचव्या टप्प्यात वाडा तालुक्यातील सांगेनाणे गावात १२५ शौचालयांचे व सौर दिव्यांचे उद्घाटन नुकतेच स्वच्छतेसाठी बकेट, मग आणि सफाईचे साहित्यही देण्यात आले. यावेळी तहसीलदार उद्धव कदम, फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, बबलू मोकळे, मंगेश तळेकर, प्रांत अधिकारी अर्चना कदम, सरपंच कांचन संभारे, तलाठी श्रीकांत कुंभार, पोलीस पाटील सुरेश पाटील, युवा परिवर्तनच्या निकोला मोंटेरिओ, भगवान कांबळे, विस्तार अधिकारी संदीप जाधव, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी बांधवांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागृती आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. गावातील शौचालयांची देखभाल आणि त्याचा होत असलेला वापर समाधानकारक असल्याचे सांगून, गावकऱ्यांनी उघड्यावर शौचास न जाता या शौचालयांचा वापर करण्याचे आवाहनही डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
या उपक्रमाविषयी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “फिनोलेक्स आणि ‘मुकुल माधव’ने ३०० शौचालयांचा टप्पा ओलांडला आहे. आदिवासी भागातील जास्तीत लोकांना या प्रकल्पाचा लाभ देण्यासाठी समविचारी लोकांना सोबत घेऊन प्रयत्न करीत आहोत. झेडएफ गिअर्स, हिंदुजा लिलॅन्ड फायनान्स आदी संस्थांचे सहकार्य लाभत आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शौचालये आणि सौर दिव्यांसह या भागात पाणी संवर्धनासाठी उपक्रम सुरु आहेत.”
बी. आर. मेहता म्हणाले, “अस्वच्छेतेमुळे अनेक आजार उद्भवतात. परिणामी, ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने ग्रामीण भागात शौचालय उभारून स्वच्छतेबाबत जागृती सुरु केली आहे. पाच टप्प्यात ३३२ शौचालये उभारली असून, पुढील सहाव्या टप्प्यात आणखी १२७ शौचालये उभारली जाणार आलेत. त्यामुळे पालघरमध्ये फाउंडेशनच्या वतीने एकूण ४५९ शौचालये उभारली जातील.”