पुणे : “आपल्या भाषेबद्दल किंवा आपल्या पूर्वायुष्याबद्दल न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, उलट आपले म्हणणे, आपले अनुभव ठासून आणि अभिमानाने आपल्याच भाषेत मांडायला हवेत, ही शिकवण आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिली. मधल्या काळात सुरु झालेल्या दलित, उपेक्षित आणि वंचितांच्या आयुष्याशी निगडित साहित्याचा प्रवास आता ‘यसन’पर्यंत येऊन ठेपला आहे. ही कादंबरी या वाटेवरचा एक मैलाचा दगड ठरते आहे, हे सांगताना आपल्याला विशेष अभिमान वाटतो,” असे प्रतिपादन जेष्ठ संपादक आणि लेखक अरुण खोरे यांनी व्यक्त केले.
प्रा. ज्ञानेश्वर जाधवर लिखित ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांवरील ‘यसन’ या कादंबरीवर आधारित ‘मानवी जगण्याचा वेध घेणारी कादंबरी’ या परिसंवादात ते बोलत होते. विद्यार्थी सहायक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्र व उचित माध्यम या संस्थांच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन समितीच्या पुसाळकर सभागृहात केले होते. यावेळी ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड, युवा उद्योजक-लेखक शरद तांदळे, ‘यसन’चे लेखक प्रा. ज्ञानेश्वर जाधवर, उचित माध्यमचे जीवराज चोले आदी उपस्थित होते.
अरुण खोरे म्हणाले, “समाजाचे विविध प्रश्न मांडण्यासाठी साहित्य अत्यंत प्रभावी माध्यम आहे. ‘यसन’ हा महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांच्या समस्यांवर, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा दुवा आहे. पिढ्यानपिढ्या ऊसतोड करणाऱ्या या समाजाचा उत्कर्ष व्हावा, यासाठी लेखकाची धडपड अतिशय महत्वाची आहे. त्याने केवळ साहित्यात ते उतरवले नाही, तर या समुदायासाठी सामाजिक भान ठेवून तो लढा देत आहे, याचेही कौतुक वाटते. साहित्य जगणारा हा लेखक आहे.”
डॉ. बबन जोगदंड म्हणाले, “शिक्षण हाच ऊसतोडणी मजुरांना परिस्थिती बदलण्यासाठी उपयुक्त असा उपाय आहे. या समुदायातील मुलांनी शिकायला हवे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली पंचसूत्री अंगीकारावी. आयुष्यात शिक्षण, वाचन, कठोर परिश्रम, संवाद कौशल्य विकसित करायला हवेत. ‘यसन’मधून ज्ञानेश्वर जाधवर यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला आहे.” शरद तांदळे यांनी विद्यार्थ्यांना साहित्य आणि उद्योजकता याविषयी मार्गदर्शन केले.
ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरी लिहिण्यामागचे प्रयोजन आणि भावना सांगितल्या. तसेच कादंबरीच्या निमित्ताने सुरु केलेल्या सामाजिक कामाबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक जीवराज चोले यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले, तर पंकज देशमुख या विद्यार्थ्याने आभार मानले.