‘रिपाइं’च्या पुढाकारातून विजयस्तंभ परिसर चकाचक
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास शौर्यदिनानिमित्त (१ जानेवारी) अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी व भीमसैनिक आले होते. अतिशय शांततेत हा अभिवादन सोहळा पार पडला. मानवंदना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी २ जानेवारीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) पुढाकारातून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली विजयस्तंभ परिसराची स्वच्छता केली. विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याने अवघ्या काही तासात परिसर चकाचक झाला.
सकाळी सात वाजता कोरेगाव भीमा येथे स्वच्छता मोहीम सुरु केली. विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आल्याने विजयस्तंभावजवळ पुष्पचक्र, फुले आणि इतर साहित्याचा ढीग लागला होता. तसेच परिसरात पाण्याच्या बाटल्या, नाश्त्याच्या प्लेट्स, जेवणाच्या पत्रावळ्या असा कचरा पडला होता. नगर रस्त्यावरील लोणीकंद ते कोरेगाव भीमा हा परिसरही स्वच्छ करण्यात आला आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली.
डॉ. सिद्धार्थ धेंडे, ‘रिपाई’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, विजय कांबळे, भीमराव जाधव, संदिप चाबुकस्वार, हेमंत मोरे, पेरणे ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी ठोंबरे, जनवाणीचे फारुख, तसेच विशाल सोनवणे आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले. ‘रिपाइं’सह स्वच्छ संस्था, आदर पुनावाला ग्रुप, जनवानी, पेरणे ग्रामपंचायत, समाज प्रबोधन ग्रुप विश्रांतवाडी, आंबेडकर अनुयायी ग्रुप आदी संस्था या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.
डॉ. धेंडे म्हणाले, “विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर येतो. आंबेडकर अनुयायी पर्यावरणप्रेमी असतात. त्याच प्रेरणेतून आणि स्वयंस्फूर्तीने गेल्या वर्षीपासून ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी कमीत कमी कचरा होईल, यासाठी प्रयत्न करावेत.”