पुणे : “देशाच्या विकासात तरुणांची भूमिका अतिशय महत्वाची असून, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या देशात तरुणवर्ग मोठा आहे. त्यांच्या योगदानातूनच देशाच्या प्रगतीला गती मिळेल. ते सामाजिक आणि आर्थिक विकासाचे स्तंभ आहेत. मात्र, देशात वाढत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना गंभीर आहेत. महिला सुरक्षेबाबत तरुणांनी जागरूक राहायला हवे. समाज माध्यमांवर व्यक्त होताना, महिलांविषयी मजकूर टाकताना काळजी घ्यायला हवी. त्याबाबत विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती करायला हवी,” असा सल्ला पुणे पोलिसांच्या भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांनी दिला.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने बावधन कॅम्पसमध्ये आयोजित ‘महिला सुरक्षा आणि देशाच्या उभारणीतील तरुणांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानावेळी विजया कारंडे बोलत होत्या. प्रसंगी राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्यासह पोलीस सुरक्षा दलातील शूर व्यक्तींना मानवंदना देण्यात आली. ‘ब्युटी विथ ब्रेन’ अशी ओळख आणि मिसेस इंडिया असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा विग्नेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. घोडके, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची चर्चासत्रे झाली.
प्रेमा पाटील म्हणाल्या, “मुलींनी आपण कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांची सुरक्षा ही केवळ महिलांची जबाबदारी नसून, आपल्या मुलांना महिलांचा आदर करण्याचे संस्कार द्यायला हवेत. योग्य संगोपनच हा बदल घडवू शकते. तरुणांनी आपल्या करिअरवर लक्ष द्यावे. मुलींनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. तरच आपले म्हणणे ऐकून घेतले जाईल. कमवा व शिका हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून आपण स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थीदशेतच आपण आपल्या देशासाठी काय योगदान देऊ शकू, याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गैरप्रवृत्तींना रोखण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. सूर्यदत्ता संस्थेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत जागृत करण्याचे ज्ञान दिले जात आहे. सामाजिक भान आणि राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये जगविण्यासाठी मूल्याधिष्ठित आणि वैश्विक दर्जाचे शिक्षण दिले जात आहे.”