संविधानाने दिला भारतीयांना सन्मान, सुरक्षितपणा-डॉ. धनंजय लोखंडे
संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्टतर्फे परिसंवाद
पुणे : ” देशाला एकसंध ठेवण्यासाठी, जनतेला त्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी उपयुक्त अशा संविधानाची निर्मिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आज संविधानामुळे भारतीय नागरिकाला सन्मान आणि सुरक्षितपणा मिळाला आहे. त्याचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रत्येकाने केले पाहिजे. केवळ जल्लोष करून मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य डॉ. धनंजय लोखंडे यांनी केले.
संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संपादक अरुण खोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘आरपीआय’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे, शहर कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, ऍड. मंदार जोशी, रोहिदास गायकवाड, आयुबभाई शेख, निलेश आल्हाट, महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, शाम सदाफुले, राहुल डंबाळे, राहुल तायडे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, शांतीलाल चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ. धनंजय लोखंडे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळेल, अशा रीतीने संविधान मांडले आहे. संविधानाने सर्वांना समानतेचा हक्क मिळवुन दिला आहे. देशांनी प्रगती झाली. परंतु संविधान संहितेची जनजागृती होताना दिसत नाही. प्रत्येक समाजाने हा संविधान दिन साजरा करणे आवश्यक आहे.”
अरुण खोरे म्हणाले, “संविधानाने भारतीय नागरिकाना सर्व हक्क दिले आहेत आणि संपूर्ण व्यक्ती स्वतंत्रही दिले आहे. सध्या काळ बदलतोय सामाजिक, राजकीय वातावरण बदलत आहेत. समाजातील काही व्यक्ती याचा गैरफायदा घेत आहेत. ते कुठेतरी थांबायला हवे. डॉ. आंबेडकर यांचे संविधान देण्याआधीचे भाषण आपण ऐकायला हवे आणि त्यानुसार आपण अनुकरण केले पाहिजे. आज जे राज्यात सत्तास्थापनेवरून जो वादंग निर्माण झाला आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने जो आज निर्णय दिला आहे तो महत्व पूर्ण आहे.”
राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचा वेशभूषा धारण केलेल्या अनुष्का आणि तनुष्का गायकवाड या चिमुकल्यानी सद्यस्थितीवर भाष्य करणारे बालनाट्य सादर केले. बाळासाहेब जानराव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी केले. आभार परशुराम वाडेकर यांनी मानले.