सर्वांच्या कल्याणासाठी आंबेडकरांकडून राज्यघटनेची निर्मिती-अरुण खोरे
पुणे : “शिक्षण, ज्ञानार्जनासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्या तळमळीने अभ्यास केला, त्याच तळमळीतून डॉ. आंबेडकरांनी सर्वांच्या कल्याणासाठी राज्यघटना निर्मितीचे कार्य केले. गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा गुरूंच्या विचारांचा समावेश संविधान तयार करत असताना केला आहे. त्यामुळे संविधान अधिक परिपक्व झाले आहे,” असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक अरुण खोरे यांनी केले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर प्रशाला येथे विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, आनंद छाजेड, बंडू ढोरे, विजय शेवाळे, दीपक मस्के, मुख्याध्यापका स्मिता फेंगसे, छाया पवार, सह प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखरे उपस्थित होते. यावेळी संविधान सन्मान पुरस्कारांचेही वितरण झाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असून, संविधान दिनी आणि रमाबाई आंबेडकर शाळेत होतोय, याचा आनंद आहे. तेही संविधानाच्या चौकटीत राहून नेहमी समाजहिताचे काम होत राहील. संविधान आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहे, त्यामुळे सर्वानी संविधानाचा आदर राखला पाहिजे.”
परशुराम वाडेकर म्हणाले, “पंतप्रधान पदापासून ते सामान्य नागरिकापर्यंत सर्वजण संविधानाचे पालन करतात. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताकडे आहे. सामान्य नागरिकाना केंद्रबिंदू मानून हे संविधान निर्माण करण्यात आले. संविधानात करुणा प्रेम भावनेने संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे.”
सूत्रसंचालन भारत आगळे यांनी केले. आभार सुनीता वाडेकर यांनी केले.