पुणे : राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांना शिक्षणाबरोबरच नीतीमूल्याची शिकवण दिली. त्याचबरोबर जीवनात यशस्वी बनण्यासाठी ज्ञानी व्यक्तींना जोडण्याचे कसब शिकवले. जिजाऊंचा हा गुण प्रत्येक महिलांनी आत्मसात करून आपल्या मुलांना नीतिमूल्यांची शिकवण देणे गरजेचे आहे,” असे मत प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास अबनावे यांनी व्यक्त केले.
‘कृष्णा फाऊंडेशन’च्या वतीने ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ आणि ‘जाणता राजा पुरस्कार’ विविध क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात आले. गंजपेठ येथील सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल, सुभाष उमाप, शशिकांत मोरे, संयोजक ऍड. वैशाली भोसले, नितीन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात सामजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ आणि ‘जाणता राजा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, “शिवाजी महाराज यांच्याकडे सावध कसे राहावे हा गुण महत्वाचा होता. त्या गुणांमुळे ते जास्तीत जास्त युद्धामध्ये यशवी झाले. आपणही आपल्या जीवनात नेहमी सावध राहून जीवन जगणे आवश्यक आहे. भारतातील पहिला राजा ज्यांनी पहिल्यांदा सागरी महत्त्व ओळखून समुद्रात किल्ला बांधला ही जाण फक्त शिवाजी महाराजांकडे होती. त्यांनी जात धर्म यांना महत्व दिले नाही, सर्व जाती धर्मातील सैन्य त्यांच्या दलात होते. शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगितला पाहिजे त्यांना अंतर्गत लोकांचा साथ नव्हती साथ मिळाली असती तर ते देशाचे राजे झाले असते. या जाणता राजा घडविण्यामध्ये राजमाता जिजाऊंचा मोलाचा वाटा होता.”
मंगलदास बांदल म्हणाले, “सध्याच्या राजकीय वातावरणावरून राजकीय नेत्यांना मतदार महत्वाचा असल्याचा दिसत नाही. मतदारांमुळेच यांना सरकार स्थापन करता येणार आहे. त्यामुळे त्यांनी मतदारांचा मान राखत लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांचा केंद्र बिंदू हा फक्त मतदारच राहिला पाहिजे आणि तिच्यासाठीच त्यांनी कार्य करत राहिले पाहिजे. तरच समाजाचा आणि त्यांचा विकास होत राहील.”
सुभाष उमाप म्हणाले, “या सन्मानामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. त्याचबरोबर अजून काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. संस्थेने समाजातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन हा पुरस्कार प्रदान केला आहे. त्यामुळे समाजहिताचे काम करणाऱ्या व्यक्ती तयार होत राहतील.” शशिकांत मोरे म्हणाले, पुरस्कार मिळणे आणि दिले जाणे यात फरक आहे. जो खर्च मनापासून सामाजिक काम करतो त्याची दखल कोणी ना कोणी घेत असतो. पुरस्काराने काम करायची इच्छा होते.
सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले. ऍड. वैशाली भोसले यांनी आभार मानले.