‘शहरी पूरसमस्ये‘वर परिसंवाद
शहरातील पुराचे खरे आरोपी कोण ?
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ‘शहरी पूरसमस्या : सत्य व मिथक’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी (दि.१५ ऑक्टोबर) सायंकाळी ६.१५ वाजता फिरोदिया सभागृह, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, शिवाजीनगर येथे हा परिसंवाद होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. डॉ. वि. वि. भोसेकर, डॉ. दि. मा. मोरे, अभिजित घोरपडे, डॉ. मंगेश कश्यप आदी मान्यवर या परिसंवादात सहभाग घेणार आहेत, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सराफ यांनी दिली.
”वादळासहित पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे तीन मुख्य मार्ग आहेत, वादळ पाण्याचे गटारे, पाणी जमिनीत मुरवणे आणि साठवण टाक्यांमध्ये संग्रह करणे. आपल्याकडे बहुतेक सर्व शहरात वादळी पावसाच्या नियोजनकडे गांभीर्याने बघितल्या जात नाही. गटारातून वादळाचे पाणी व सांडपाणी वाहून जात असे. शहरीकरण झाल्यामुळे नैसर्गिक अडथळे आणि पाण्याचे जमिनीत मुरणे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. निचरा न झाल्यामुळे पावसाचे पाणी तुंबते वा खूप वेगाने वाहायला लागते. भूमी वापराच्या पद्धती बदलल्यामुळे पाणी तुंबण्याचा व वाहण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळं शहरात पूर सदृश परिस्थिती निर्माण होते. ह्यालाच शहरी पूर असे म्हणले जाते. नगररचना व विकासाचा एक भाग म्हणून पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी विचार करण्याची तातडीने गरज आहे. शहरास स्मार्ट बनविण्यासाठी हे देखील एक महत्वाचे मापदंड आहे. ‘शहरी पूरसमस्या सत्य व मिथक’ या परिसंवादाच्या माध्यमातून या विषयावर प्रकाश टाकण्यात येणार आहे,” असेही सराफ यांनी नमूद केले.