वंचित, दुर्लक्षितांचे प्रश्न मांडण्यासाठी साहित्य पूरक- डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : ”सत्य लिहले की देशद्रोह ठरतो, अशा काळात नवीन पिढीतील लेखक त्यांनी अनुभवलेले जळजळीत वास्तव लेखनाच्या माध्यमातून समाजापुढे मांडत आहेत. आज वंचित, दुर्लक्षित, श्रमिक अशा नाहिरे वार्गाचे प्रश्न, त्यांचे जीवन मराठी साहित्यातुन पुढे येत आहे. त्यांच्या जीवनाच्या शब्दकोशातील अस्सलपणा कादंबरीसारख्या प्रकारातून मांडला जात आहे. हे लेखन इतरांना लढण्याची प्रेरणा देत आहेत. त्यामुळे वंचित, दुर्लक्षितांचे प्रश्न समाजासमोर मांडण्यासाठी साहित्य पूरक आहे,” असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आणि ‘रंग लेखणीचे’ या विद्यार्थी गटाच्या संयुक्त विद्यमाने ‘यसन : वास्तव व मानवतावादी’ या कादंबरीवर आणि तरुणांपुढिल साहित्य निर्मितीची आव्हाने या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. सबनीस बोलत होते. आळंदी येथील एमआयटी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रा. विश्राम ढोले, समीक्षक प्रा. डॉ. दत्ता घोलप, महाविद्यालयाचे संचालक डॉ. महेश गौडर, ‘यसन’ कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर, पत्रकार विश्वास वाघमोडे उपस्थित होते. प्रा. हुसेन शेख आणि शैलेश भोकरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ”आज वेगवेगळ्या प्रकारे मेंदूला ‘यसन’ घातली जात आहे. अशा काळातही नवोदित लेखक आपले भवतालच्या गोष्टी निर्भयपणे मांडताहेत, हे आशादायी आहे. ‘यसन’मधून ज्ञानेश्वर जाधवर यांनी ऊसतोड मजुरांच्या वेदनांचे, सुख-दुःखाचे, संघार्षाचे प्रसंग, त्याची अपरिहार्यता अतिशय वास्तवरूपात मांडली आहे. दुर्लक्षित्यांच्या वास्तवाला स्पर्श करत दुःखाचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत. उपेक्षित प्रावाहातून आलेल्या संवेदशील लेखकाची ही कादंबरी आहे. आज सृजनशील लेखक, कलावंत, अभियंते निर्माण होण्याची आवश्यक्यता आहे. त्यासाठी प्रयोगशील शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. माणूस अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे. मात्र, भौतिक प्रगतीबरोबरच चांगला माणूस बनणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी साहित्य आपला सोबती बनायला हवा.”
प्रा. दत्ता घोलप म्हणाले, ”आज मराठी साहित्यात वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लेखक निर्माण होत आहे. त्यांचे अनुभव लेखनातून पुढे येत आहेत. त्यांनी जे भोगलेले, त्यागलेले जग आहे, ते साहित्यातुन मांडत आहेत. राबणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या, वंचितांच्या, शोषितांच्या गोष्टी समोर येत आहेत. ही खूप चांगली बाब आहे. मराठी कादंबरी अजूनही गरिबांच्या तसेच विवेकाच्या बाजूने बोलते ही सकारात्मक बाब आहे. या कादंबरीत नायक उदरातून निवेदन करतो, हे मराठी साहित्यात पहिल्यांदाच घडताना बघितले आहे. १९९० नंतरचा आई-वडील आणि मुलांच्या नात्यातील भावनिक संघर्ष मांडताना ही कादंबरी महत्वपूर्ण ठरते.”
प्रा. विश्राम ढोले म्हणाले, ”आज सामाजिक माध्यमांवर खूप लिहले जाते. मात्र, साहित्य म्हणून त्याकडे पाहताना त्यावर मर्यादा आहेत. अशावेळी तरुणांकडून दीर्घ कादंबरी लिहिल्या जातात, हे महत्त्वाचे आहे. त्यातून त्यांनी अनुभवलेले दाहक वास्तव, समाजातील विविध प्रश्न मांडताहेत. असे लिखाण होत राहावे. त्यातून वंचितांचे दुःख जगासमोर येईल. ‘यसन’मधून सर्वसामान्य वाचकांसमोर वेगळे विश्व पुढे येत आहे. उसतोड कामगाराचे जीवन, त्याच्या समस्या सार्वांना समजतील.”
ज्ञानेश्वर जाधवर म्हणाले, ”ऊसतोड मजुरांचे कुटूंबातून आलो, ते जगणे कादंबरीतून मांडले. जीवनात अनुभवलेल्या, बघितलेल्या घटना ‘यसन’मध्ये लिहिल्या आहेत. जवळपास आठ लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यांच्या जगण्याचा, घराचा, शिक्षणाचा, स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. हे सगळे प्रश्न लोकांसमोर आणण्याचा या कादंबरीचा प्रयत्न प्रयत्न आहे. लेखनशैली विकसित करण्यासाठी वाचन, अभ्यास, बोली भाषेतील शब्दसंग्रहाचा उपयोग होतो. अनुभवलेल्या भावना लेखनात उतरल्या, तर वाचकांच्या मनाला आपले लेखन भिडते.”
विश्वास वाघमोडे म्हणाले,”ऊसतोड कामगारांच्या घामाच्या पैशावर कारखानदार मोठे झाले. पण त्यांचे प्रश्न तसेच आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या उसातच गेल्या. दिवाळी, दसरा त्यांना कधी अनुभवता येत नाही. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळा असाव्यात का, या प्रश्नावर सरकार गेले १० वर्ष विचार करत आहेत. यांचा संघर्ष मात्र आजही सुरूच आहे.” प्रा. हुसेन शेख यांनी प्रास्ताविक केले. सिद्धार्थ सातभाईने सूत्रसंचालन, तर माधव क्षीरसागरने आभार मानले.