फेस्टिवलच्या दुसऱ्या वर्षीही २० मातब्बर आद्योगिक लेखकांना ऐकण्याची पुणेकरांना पर्वणी
पुणे : औद्योगिक साहित्याची पर्वणी असलेले इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवल (आयबीएलएफ) येत्या शनिवारी (ता. ५ ऑक्टोबर) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या किर्लोस्कर सभागृहात होणार आहे. फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये उद्योग जगतातील जवळपास २० मात्तबर लेखकांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे, अशी माहिती फेस्टिवलचे संयोजक आणि लेखक समीर दुआ, ‘सीओईपी’चे संचालक डॉ. बी. बी. अहुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्सियल अनॅलिस्ट्स ऑफ इंडिया बिझनेस स्कुल (आयसीएफएआय), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी), बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड, इन्स्टिट्यूट ऑफ जनरेटिव्ह लीडरशिप, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कुल-एक्स, फीदरलाईट, नॅसकॉम, ऑनलाईन बिझनेस, टीआयई पुणे आणि माझाना या संस्थांच्या सहयोगाने हे दुसरे फेस्टिवल होत आहे. समीर दुआ यांच्यासह होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, बिझनेसवर्ल्डचे चेअरपर्सन अनुराग बात्रा यांच्या कल्पनेतून हे फेस्टिवल होत आहे.
समीर दुआ म्हणाले, “पहिल्या फेस्टिवलच्या प्रचंड प्रतिसादानंतर यंदा आणखी सकस साहित्य देण्यासाठी सज्ज आहोत. ‘आयबीएलएफ’ हे उद्योगांवर लेखन करणाऱ्यांसाठी, आपले कार्य, साहित्य लोकांसमोर मांडून त्याचा व्यावसायिक क्षेत्रावर चांगला परिणाम घडवून आणण्यासाठी, तसेच उद्योग साहित्य लिहिण्याची व वाचण्याची गोडी लागण्यासाठी हे फेस्टिवल महत्वपूर्ण ठरत आहे. ‘टेडएक्स’च्या धर्तीवर यातील सत्रे होणार असून, प्रत्येक लेखकाला १८ मिनिटे बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे श्रोत्यांना रटाळ भाषणे ऐकावी लागणार नाहीत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक, ‘केपीआयटी’चे सहसंस्थापक रवी पंडित, आयसीएफएआय बिझनेस स्कुलच्या संचालिका प्रा. ज्योती टिळक, डॉ. शिरीष जोबळे, लेखक आर. गोपालकृष्णन, किशोर चक्रवर्ती, जयराम ईश्वरन, अपर्णा राजे, अवार्ड विनिंग व्हायरल व्हिडीओ मार्केटर आशिष चोप्रा, टूलटेक ग्लोबल इंजिनिअरिंगचे संस्थापक अतुल खन्ना, एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च अधिष्ठाता डॉ. रंजन बॅनर्जी, उद्योजक डॉ. गणेश नटराजन, डॉ. बी. बी. अहुजा, लेखक-पत्रकार पवन लाल, जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर, लेखक-संपादक शशांक शहा, मानसोपचारतज्ज्ञ सैलजा मनाचा, लेखक नरेंद्र गोईदानी, लेखक-वकील मुक्ता महाजनी या फेस्टिवलमध्ये बोलणार आहेत.”
डॉ. बी. बी. अहुजा म्हणाले, “उद्योग विषयक साहित्याला प्रोत्साहन मिळावे, नव्या पिढीला त्याची गोडी लागावी, यासाठी हे फेस्टिवल उपयुक्त आहे. या उद्योग लेखकांची मनोगते ऐकून अनेक विद्यार्थी आंत्रप्रेन्युअरशिपकडे वळत आहेत. आमच्या विद्यार्थी, प्राध्यापकांनाही याचा लाभ होणार आहे. या उद्योग साहित्यिकांचे विचार ऐकण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी यावे. हे फेस्टिवल सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.”