लघुपटातून उलगडणार ‘पोलिस फाईल्स’
पुणे : “पोलिसांबाबत आस्था वाटणारे अधिकारी आपल्यात आहेत. त्यांच्या व्यथा समजण्यासाठी असे साहित्य निर्माण व्हायला हवे. वर्दीतल्या कठोर पोलीसांमागे भावनाशील माणूस दडलेला असतो. तो माणूस या ‘पोलीस फाईल्स’मधून व्यक्त झाल्याचे दिसत आहे. या तपासकथा वाचताना विषयांचे वैविध्य त्यांना आलेले अनुभव यात आले आहे. पोलिसांचे जगणे, त्यांच्या भावनिक कथा याव्यात. त्यासाठी लवकरच एका लघुपटातून पोलिसांचे जीवन उलगडणार आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित आणि पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम संकल्पित ‘पोलीस फाईल्स’ पुणे पोलिसांच्या तपासकथा पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. बाणेर रस्त्यावरील यशदामध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर होत्या. डॉ. के. व्यंकटेशम, अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, विश्वकर्मा ग्रुपचे चेअरमन राजकुमार अगरवाल, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, पुस्तकाच्या समन्वयिका विदुला टोकेकर आदी उपस्थित होते.
नागराज मंजुळे म्हणाले, “पोलिस अकार्यक्षम असल्याचे बोलले जाते. मात्र, आपण समाज म्हणून आपल्या जबाबदारी पाळतो का? याचा विचार केला पाहिजे. पोलीस रात्रंदिवस आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या अंगाने गुन्हा उलगडण्यासाठी काम करतात. त्यांचे अनुभव अशा स्वरूपात यावेत, हे त्यांच्या कार्याची दखल आहे. त्यांच्यात दडलेला कवी, लेखक, कलाकार जागा झाला पाहिजे.”
मीरा बोरवणकर म्हणाल्या, “पोलिसांबाबत जनतेने विश्वास दाखवला तर आणखी जोमाने काम करता येईल. गुन्हेगारांच्या स्वभावाचे पैलू जाणून घेताना नानाविध शकला लढवाव्या लागतात. पोलीसांनी बोलते व्हायला हवे. पोलिस बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांना भावना नाहीत असे नाही. एक केस उलगडताना नेमके काय काय होते हे आपल्या लक्षात येईल. वर्दीमध्ये असल्याने आम्ही साचेबद्ध झालो आहोत. आमच्यातील भावनाशील माणूस जागा व्हायला हवा.”
डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, “पोलीस प्रज्ञाशील असतात. विविध परिस्थितीत गुन्ह्यांचा उलगडा करतात. त्यांच्या कुशलतेला शब्दबद्ध करुन लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न केला आहे. तपासादरम्यान पोलिसांना खूप वेगवेगळे अनुभव येत असतात. हे अनुभव पुस्तकरूपात आल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आपले अनुभव कथेत मांडतील.”
अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, “या पोलिस कथांमधून इतर पोलिस अधिकारी लिहीते होतील. पोलिसांसंबधीत संशोधनात आपण योगदान द्यावे. त्यासाठी विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार करत आहोत.” संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. विदुला टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र शिसवे यांनी आभार मानले.
—————-
‘सैराट’चा मथळा होतो : मंजुळे
सैराट चित्रपटानंतर अनेक गुन्हे आणि मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले, असा समाज समाजात आहे. मात्र, चित्रपट येण्याआधीही हे घडतच होते. ‘सैराट’ने जातीधर्मापलीकडे जाण्याचा संदेश दिला आहे. चित्रपट लोकप्रिय झाल्यामुळे सर्वजण ‘सैराट’ला दोषी ठरवू लागले. आज मंत्री जरी कुठे गोंधळ घालत असेल, तर वर्तमानपत्रात ‘मंत्री झाले सैराट’ असे मथळे पाहायला मिळतात.