मुंबई- ”तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढू. आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांना पुरुन उरू,” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवशेनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
अधिवेशनात बोलताना फडणवीस म्हणाले की, ”सावरकरांवर टीका करणाऱ्यांना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेस्तनाबूत करायचे. मात्र आता सावकरांचा अपमान रोज काँग्रेस करत आहे. हिंमत असेल तर शिदोरी मासिकावर बंदी घाला,” असे फडणवीस म्हणाले. भीमा कोरेगावची चौकशी केंद्रीय एजन्सी एनआयएकडे देण्याबाबत फडणवीस म्हणाले की, “मी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. शरद पवार या निर्णयाला विरोध करत आहेत, सत्य बाहेर येईल याची त्यांना भीती होती,” असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केला.
‘अयोध्येला जा, तुमचे रक्त उफाळून येईल’- फडणवीस
“आता लवकरच राम मंदिर बांधले जाणार आहे. अनेकजण अयोध्येत जाण्यासाठी निघाले आहेत. तुम्ही तिथे जा, कदाचित तिथे गेल्यानंतर तुमच्या हिंदुत्वाचं रक्त उफाळून येईल, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टोला लगावला. पुढे ते म्हणाले की, “भाजपचे ऐकवण्याचे दिवस संपले आता सुनवण्याचे दिवस आले आहेत. उद्धवजी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवाल असे वचन बाळासाहेबांना दिले होते का? बाळासाहेबांनी तुम्हाला कधी माफ केले नसते. एखाद्या विश्वासघाताने सरकार गेले, घाबरण्याचे कारण नाही. आमच संपूर्ण जीवनचं विरोधकांचं आणि आपला डीएनएदेखील विरोधकांचा आहे. विरोधकाची भूमिका करण्यासाठी थेट मुकाबला करावा लागतो. या सरकारला जेरीस आणायला वेळ लागणार नाही. तुम्ही जनतेविरोधी भूमिका घेतली तर भाजप सरकारला सोडणार नाही.”
“खोटं बोल पण रेटून बोल, जवाहरलाला नेहरु यांनी लियाकतसोबत करार केला होता की, जर पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि जैन धर्मियांवर जर अत्याचार झाला त्यांना आम्ही भारतात घेऊ. पण काही लोक सत्तेविना मासळीसारखे तडफडत आहेत. कुणाचीही नागरिकता काढून घेतली जाणार नाही. असे असून अनेकजण चुकीची माहिती पसरवत आहेत. काही पक्ष सत्तेत येण्यासाठी तेढ निर्माण करतात. ते सत्तेविना राहू शकत नाहीत. मोठे मोठे लोकं सत्त्तेसाठी खोटं बोलतात. शरद पवारांना सीएएवर सर्व काही माहिती आहे. लोकांना कन्फ्युज करणे, त्यांची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत,” असेही फडणवीस म्हणाले.