मुंबई( खंडूराज गायकवाड)-
तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी चौदाव्या वर्षी पायात घुंगरं बांधून तमाशा फडाच्या रंगमंचावर आल्या.. नाचता नाचता त्यांनी रंगमंचाच्या मागे जावून एका बाळाला जन्म दिला,अन आपली नाळ दगडाने ठेचून पुन्हा काही मिनिटांत प्रेक्षकांच्या आग्रहखातर रंगमंचावर अवतरल्या..१९६२च्या भारत -चीन युद्धा नंतर विठाबाई आपल्या वडीलासह भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सीमारेषेवर गेल्या, अन आपल्या तमाशाच्या माध्यमातून जवानांचे मनोरंजन त्यांनी केले..अशा या लोककलेतील अष्टपैलू कलावंताचा देशभर कौतुक झाले . पण त्यांचा प्रवासही तेवढाच अत्यंत यातनादायी ठरला.यांचीही खंत आहे.म्हणून याची दखल घेऊनच सन२००६ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कै विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्याची घोषणा नारायणगाव येथे येवून केली. तमाशा क्ष्रेत्रातील जेष्ठ लोककलावंतला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.आजही ही परंपरा अखंडीत सुरू आहे.पाच दिवस ढोलकी फड तमाशा महोत्सव वाशी येथे आयोजित करून पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी हा पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवर कलावंताला प्रदान केला जातो.
साधारणपणे दरवर्षी हा पुरस्कार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात “पुरस्कार निवड समिती” एक बैठक घेवून जाहीर करते.त्यानंतर जानेवारी अखेरीस किंवा फ़्रेबुवारी महिन्यात पाच दिवस आयोजित केलेल्या तमाशा महोत्सवात हा पुरस्कार प्रदान केला जातो.
मात्र आज फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी सांस्कृतिक कार्य विभागाला कै विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार घोषित करायला जाग आली नाही.याचा अर्थ असा लावायचा का? विठाबाई या केवळ दलित समाजाच्या असल्याने या गाव कुसा बाहेरील लोककलावंताची खूपच तातडीने दखल घ्यायची गरज नाही.
गुरुवार दि.३०जानेवारी २०२० गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला.सदर पुरस्कार जेष्ठ संगीत दिगदर्शिका श्रीमती उषा खन्ना यांना प्रदान करण्यात आला.तर मंगळवार दि.४फेब्रुवारी २०२० रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने असणारा शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार पंडित अरविंद परिख यांना बहाल करण्यात आला.हे दोन्ही ही कार्यक्रम शानदार झाला.ह्या पुरस्काराचे मानकरी तेवढेच उंचीचे आहे.त्यांचे योगदान कला क्ष्रेत्रात मोठे आहे.पण असे सोहळे करायला जेवढे सांस्कृतिक कार्य संचालनालय तत्परता दाखवते,तशी विठाबाई यांच्या नावाने पुरस्कार दयायला एवढी टाळाटाळ का होत आहे..डिसेंबर पासून संचालनालयाला पुरस्कार वितरणाबाबत विचारणा होतेय. मात्र लवकर कार्यक्रम आयोजित करू..! या पलीकडे नवीन उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले नाही. अभिजनांच्या कला आणि लोककला यामध्ये भेदभाव जर सरकारकडून होत असेल तर महाराष्ट्रातील लोककलावंत शांत बसेल का? एक दिवस तो रस्त्यावर येवू आपल्या हक्कासाठी भांडेल.
विठाबाई नारायणगावकर यांना आपल्या जातीचा अभिमान होता.म्हणूनच त्यांनी आपल्या तमाशाच्या गाड्यावर” विठाबाई भाऊ(मांग) नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ “असे लिहुन संपुर्ण देशाला आपल्या जातीचा अभिमान दाखविला. रसिकांनी त्यांना तमाशा सम्राज्ञी हा पुरस्कार बहाल केला.त्यामुळे त्यांच्या नावाने देण्यात येणार।पुरस्कार त्याच भावनेतून दिला पाहिजे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक कार्य खात्याचा पदभार घेतल्यापासून तीन वेळा निवेदन देवून मार्चच्या आत हा महोत्सव झाला पाहिजे अशी मागणी केली. मात्र अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.
आज सांस्कृतिक कार्य संचालनालय म्हणजे अंतर्गत राजकारणाचे कार्यालय झाले आहे.या वादात अभिजात लोककला आणि ग्रामीण लोककला यात भेदभाव सुरू झाला..चित्रपट महोत्सव असो..नाहीतर नाट्य महोत्सव असो.किंवा तमाशा महोत्सव वगळून एखादा पुरस्कार सोहळा असो.आमच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांपासून सर्व अधिकारी रात्र-रात्र झोपत नाही.येवढा ताण कार्यक्रमाचा घेतात.अन वाशी येथे तमाशा महोत्सव असला की त्या लोककलावंताना व्यवस्थित जेवण आहे का? येवढा शंभर दीडशे लोककलावंतांचा समूह आल्यावर त्यांना स्वच्छ पाणी आहे का? राहण्याची व्यवस्था कशी असावी हे पाहण्यासाठी एक कार्यक्रम अधिकारी धाडतात. म्हणजेच अधिकारी कलेमध्ये ही भेदाभेद करीत असतात.यावरून लक्षात येते.
सांस्कृतिक कार्य खात्याच्या जीवन गौरव पुरस्कारापेक्षा विठाबाईचे कार्य मोठे आहे.एका हिऱ्याचा अस्त झाला तरी त्यांच्या अदाकारीने प्रेक्षकांना पडलेली भुरळ नजरे आड गेली नाही.त्या केवळ दलित असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करीत असतील तर अशा अधिकाऱ्यांना आपल्या खुर्च्या उबवायचा अधिकार नाही.अभिजनांच्या कलांना एक न्याय आणि ग्रामजणांच्या कलांना सावत्र पणाची वागणूक महाराष्ट्राची लोककला रसिक खपवून घेणार नाही.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आणि सहसंचालक यांच्या अंतर्गत वादाची झळ महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा असलेल्या लोककलेला बसू नये.एवढीच सरकार मायबाप यांच्याकडे अपेक्षा