मुंबई- अरबी समुद्रात “महा” नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस(8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने परत यावे. असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.अतिवृष्टीमुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग तात्काळ करावा लागेल, त्याकरिता नदीकाठच्या सर्व नागरिकांनी या दरम्यान सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. विशेष नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
नागरिकांसाठी काही महत्वाच्या सूचना
> शेतकरी बांधवांनी शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा किंवा सुरक्षित साठवणूक करावी. जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे शेतमाल खराब होणार नाही. विशेष काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.
> वादळामुळे व वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेड, पत्रे, कमकुवत घरे, झाडे, गुरांचे गोठे, पशुपालन शेड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.
> शाळांचे पत्रे, घरांचे पत्रे, कांदा चाळ पत्रे वाऱ्यामुळे उडू शकतात त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी संबंधितांनी याकडे विशेष लक्ष द्यावे.
> अतिवृष्टीमुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहावे.
> नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करू नये, तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये.
> विद्युत खांबापासून दूर रहावे.
> जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.
> वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये.
> कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
> धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू नये.
> गोदावरीस पूर आल्यास पंचवटी, रामकुंड क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी.
> विजेंचा आवाज होत असल्यास घराबाहेर पडू नये.
> पर्यटन स्थळी जातांना हवामानाचा अंदाज घ्यावा.