नवी दिल्ली – देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. यापासून बचावासाठी सरकार आवश्यक अशी सर्व पावले उचलत आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी कोरोनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सूर्याची किरणे सर्व व्हायरस नष्ट करतात असा दावा चौबे यांनी केला आहे. गुरुवारी संसद परिसरात कोरोनावरील उपयायोजनांबाबत त्यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की, “सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ऊन जास्त असते. प्रत्येक जण 10-15 मिनिटे उन्हात बसले तर त्याचा लाभ होईल. सूर्यप्रकाशातून व्हिटामिन डी मिळते आणि इम्युनिटी सुद्धा वाढते. सोबतच सर्वप्रकारचे व्हायरस नष्ट होतात. यामुळे सर्वांनी उन्हात बसले पाहिजे.”
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 177 झाली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये 3 आणि चंदीगड, कर्नाटकात प्रत्येकी एका प्रकरणाची पुष्टी झाली. ब्रिटनहून चंडीगडला आलेल्या 23 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अशात सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलत आहे.
चौबे यापूर्वीही आपल्या विधानांमुळे राहिले चर्चेत
अश्विनी चौबे याआधीही आपल्या विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये कांद्याचा भाव 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचला होता. याबाबत चौबेंना विचारले असता ते म्हणाले होते की, “मी शाकाहारी आहे. मी कधीच कांदा खाल्लेला नाही. मी कांदाच खाल्ला नसल्यामुळे मला कांद्याचे भाव कसे माहित असतील?”