पुणे- शहरात मोठ्या प्रमाणात ‘कोरोना’ विषाणू बाधितचे रुग्ण आढळून येत असल्याने पुणे महापालिकेने आता धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ ऑफीस, सर्व पेठाचा भाग सील करण्यात येणार आहे, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. आज रात्री 12 वाजल्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
हा भाग सील करण्यात येणार असल्याने लोकांच्या जाण्या-येण्यावर बंधने येणार आहेत. मात्र, जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले
पुण्यातील जुन्या पेठांमध्ये कोरोनाचे 37 रुग्ण सापडल्याने हा भाग सील करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. तसेच कोंढवा भागातही अशीच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आकडा वाढण्याला अटकाव करण्यासाठी सीलिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड आहे. कोणता भाग सील झाला आहे, याचा निश्चित नकाशा पुणे पोलिसांकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे.
एकाच भागातील व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय़ घेण्यात आला आहे.
गुलटेकडी ते आरटीओ दरम्यानचा हा सगळा भाग असणार आहे. यानुसार नागरिकांना शंभर टक्के मास्क लावण्याचे बंधन असणार आहे.याशिवाय त्यांनी बाहेर पडायचे नाही. या क्षेत्रातून कोणालाही प्रवास करता येणार नाही. या सील केलेल्या भागात कोणालाही घराबाहेर विनाकारण पडता येणार नाही. कोणाला हा भाग ओलांडून पलीकडे जायचे असेल तरी त्याला या भागात येण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. गुलटेकडी मार्केटयार्डचा भाग या सीलिंगमध्ये येणार असला तरी येथील भाजीपाला बाजार सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
नायडु रुग्णालय फुल्ल
.पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात 100 कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. तेथील क्षमता संपल्याने आता औंध येथील रुग्णालयात नव्या रुग्णांना हलविण्यात येणार आहे. रुग्णांची संख्या कितीही अगदी 25 हजारापर्यंत वाढली तरी पुणे महापालिकेची त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र हा आकडा वाढू द्यायचा नसेल निर्बंध घालण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. मरकझमध्ये गेलेले 30 कोरोनाचे रुग्ण पुण्यात दाखल आहे. पुण्यात आतापर्यंत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 868 झाली आहे.
सील करण्यात येणार असलेल्या भागांत 37 पेशन्ट आढळले आहेत. तर, आतापर्यंत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लोकांना वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याने महापालिका प्रशासनाने ही धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.