मुंबई – इक्बाल मिर्ची मालमत्ता तपास आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला. यासाठी ईडीने कुंद्रा यांना 4 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र राज कुंद्रांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मिर्चीसोबतच्या जमिनीच्या व्यवहारावरुन ईडीने समन्स बजावला होता.
राज कुंद्रांनी इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. रंजित बिंद्रा इक्बाल मिर्चीसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. त्याचमुळे राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान 2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागदपत्रे माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिले आहे.