पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तरी प्रत्येकाने मतदान करावे. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाला घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्ह्यातील 77 लाख 29 हजार 217 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 21 तारखेला होणारी मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्हावी. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज सज्ज आहे, एकूण 7915 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या मतदान केंद्रापैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 21 मतदान केंद्रांना सखी मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या मतदान केंद्राची संपूर्ण व्यवस्था महिला अधिकारी सांभाळणार आहेत. अशी एकूण 21 मतदान केंद्रे सखी मतदार केंद्र जिल्ह्यात असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे शहारातील मतदारसंघाची तसेच संपूर्ण जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदार जनजागृती अभियानाच्या माध्यमातून अनेक जागृतीचे उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी व्हीलचेअरचा वापर करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे.
मतदानाच्या हक्कापासून कामगार व मजूरवर्ग वंचित राहू नये याकरिता 21 ऑक्टोबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलीस अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड सह बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.