मुंबई. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. बुधवारी महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 321 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत 16, पुण्यात 2 आणि बुलडाण्यात 1 नवा करोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.
मुंबई शहर आणि परिसरात सोमवारी सापडलेल्या ३० रुग्णांसह मंगळवार संध्याकाळपर्यंत २९ रुग्णांची वाढ होऊन आकडा तब्बल ५९ वर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १५६ वर गेली आहे. १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील, ५ रुग्ण पुण्याचे, तीन नगरचे आणि २ बुलडाण्यातील आहेत.
महाराष्ट्रातून दिल्लीतील कार्यक्रमास गेलेल्यांना शोधा : आरोग्यमंत्री टोपे
दिल्लीतील तबलिगी जमात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १०० वर जण सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्याच्या सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. टोपे म्हणाले, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्याच्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांना लगेच क्वाॅरंटाइन करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील.
अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना १ हजार रुपये
ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्तींनी प्रोत्साहनपर १ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांना नियमित वेतन-मानधनाव्यतिरिक्त १ हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. याशिवाय या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. मुंबईत मंगळवारी रहिवाशांनी अख्खी इमारतच धुऊन काढली.
६,३३१ पैकी ५,७८० जणांचे नमुने निगेटिव्ह
राज्यात मंगळवारी एकूण ४०६ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत. मंगळवारपर्यंत पाठवण्यात आलेल्या ६,३३१ नमुन्यांपैकी ५,७८० जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या २३,९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या
मुंबई १५१, ठाणे मंडळातील इतर मनपा ३६, पुणे शहर व ग्रामीण ४८, सांगली २५, नागपूर १६, नगर ८, यवतमाळ ४, बुलडाणा ३, सातारा, कोल्हापूर २, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी १, गुजरातचा १.
आरोप : डॉक्टरांकडे जाऊ न दिल्यामुळे वृद्धाचा मृत्यू
कुर्ल्यात ३० मार्चला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे हा भाग बंद करण्यात आला होता. ज्या इमारतीत रुग्ण सापडला होता, त्याच इमारतीत राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्रीच त्यांची तब्येत बिघडली होती. पण पोलिसांनी बिल्डिंग सील केल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊ दिले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. परिणामी त्यांची तब्येत जास्त खालावली.