सुनील माने यांच्यातर्फे झालेल्या व्याख्यानात
लेफ्टनंट जनरल डॉ. शेकटकर यांचा गर्भित इशारा
पुणे : कलम ३७० हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. सर्वार्थाने भारतापुढे कमजोर असणाऱ्या पाकिस्तानकडून आता अणू बॉम्बच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, हा विचारही त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यांनी ही चूक केल्यास त्यांचे अस्तित्व नकाशातून नष्ट होईल. पाकिस्तानचा भूभाग शोधण्यासाठी पुन्हा एखाद्या वास्को द गामाला याव लागेल, असे ठणकावत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी शेकटकर यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिला.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्यातर्फे त्यांचे ‘कलम ३७०, काश्मीर आणि आपण’ या विषयावर व्याख्यान ठेवले होते. यावेळी ते बोलत होते. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीशजी बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक अजय खेडेकर, अमोल बालवडकर, दीपक पोटे, किरण दगडे पाटील, व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अंबरीश दरक, सामजिक कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड, विनोद सातव उपस्थित होते. डॉ. शेकटकर यांनी समर्पक दाखले देत अत्यंत विस्ताराने काश्मीर विषय आपल्या व्याख्यानातून मांडला. दुसरे महायुद्ध, पाक व्याप्त काश्मीर, चीनची कटकारस्थाने, भारताची मवाळ भूमिका, फोफावलेला आंतकवाद, आर्थिक, राजकीय, सामाजिक समीकरणे अशा चौफेर संदर्भातून त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत काश्मीर प्रश्नाचे विश्लेषण केले.
शेकटकर म्हणाले की, पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या विरुद्ध १० पाकिस्तान उभे राहिले तरी ते बेचीराख होतील. पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवण्यात चीनचा असणारा धूर्त हेतूही अनेकदा जगासमोर आला आहे. परंतु, काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे. हा प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य आपल्या देशात असून याविषयी कोणाचीच मध्यस्थी आम्हाला नको.
यावेळी बापट म्हणाले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कलम ३७०ला विरोध होता. संसदेमध्ये हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला त्या क्षणाचा मी साक्षीदार होतो. हा अनुभव अत्यंत रोमांचकारक व स्फूर्तीदायक होता. हे कलम रद्द करण्याच्या बाजूने ३७० मते पडली हा एक योगायोग म्हणावा लागेल. दोन्ही सभागृहात झालेले मतदान हे भाजपच्या खासदारांपेक्षा जास्त होते. यावरून पक्षापेक्षा देशहिताला संसदेमध्ये प्राधान्य दिले जाते हे सिद्ध झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आजची तरुण पिढी फार अलिप्तपणे पाहत आहे याची खंत वाटते. जर या परिस्थितीत बदल झाला नाही तर आंतकवाद आपल्या दारात येईल. याचे गांभीर्य समजवण्यासाठी डॉ. शेकटकर यांनी पुस्तक लिहून हा प्रश्न घरोघरी पोहोचवावा.
सुनील माने यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. शेकटकर यांचा परिचय करून दिला. ते म्हणाले, ‘पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांची कार्यपद्धती जवळून अनुभवता आली. त्याचे शैक्षणिक आणि लष्करातील कर्तुत्व अफाट आणि असीम आहे. त्यांच्यासमवेत थिंक टॅंक संकल्पनेवर काम कारायला मिळाले हे माझे भाग्य समजतो.’ या व्याख्यानास तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. जयेश कासट यांनी आभार मानले.
७० वर्षे गेली आता ७० महिने तरी द्यायला हवेत: डॉ. शेकटकर
डॉ. शेकटकर यांच्या व्याख्यानाने प्रभावित झालेल्या तरुणांचा कार्यक्रम संपल्यावर त्यांच्याभोवती एकच घोळका जमला. राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या प्रत्येक तरुणाच्या मनातील एकच प्रश्न सातत्याने पुढे येत होता, “सर आता पाक व्याप्त काश्मीर प्रश्न कधी मार्गी लागणार? यावेळी या प्रश्नाचे स्मितहस्याने स्वागत करत डॉ. शेकटकर म्हणाले, तुमचा प्रश्न रास्त आहे. तुम्हा तरुण पिढीकडून राष्ट्राविषयी हीच तळमळ मला अपेक्षित आहे. पण कलम ३७० रद्द करायला ७० वर्षे जावी लागली. तर किमान ७० महिने तरी आपण पाक व्याप्त काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी द्यायला हवे.