पुणे : माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विमान गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येणार होते. मात्र त्याचवेळी नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने एटीसी (एअर ट्रॅफिक कंटोल) यांनी सिंधिया यांना पुण्याकडे येताना रोखले,मोदींच्या तानाशाही चे रूप या घटनेतून स्पष्ट झाल्याचा आरोप पुणे शहर काँग्रेस चे अध्यक्ष आणि पुणे कँटोमेन्ट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केला.दरम्यान भोसरी, चिंचवड़ सह 4 ठिकाणी अभिनेते खासदारअमोल कोल्हे यांच्या सभा देखील हेलीकॉप्टर ला फ्लाइंग परमिशन नाकरल्याने होवू शकल्या नाहीत . या घटनांमुळे मोदींच्या आणि भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्याने त्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप होतो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन सभा आज रद्द कराव्या लागल्या. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा असल्याने हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली होती. दरम्यान, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे? याविषयी संभ्रम निर्माण होत असल्याची खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुवारी वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात सिंधिया यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सिंधिया अनुपस्थित राहिले. याविषयीचे कारण स्पष्ट करताना जोशी आणि बागवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सिंधिया यांना आणण्यासाठी विमानतळावर गेलो होतो. सोलापूर येथील सभा घेऊन ते सायंकाळी साडेसहा वाजता वानवडी येथे येणार होते.
परंतु त्याचवेळी सिंधिया यांना सोलापूरवरून उड्डाण करण्यास एटीसीने मज्जाव केल्याचे समजले. याचे मुख्य कारण सिंधिया यांनी एटीएसला विचारले असता त्यांनी “पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला त्याठिकाणी जाता येणार नाही,” असे सिंधिया यांना सांगितले.
एकीकडे एटीसीने सुरक्षाचे कारण देत असली तरी त्यावेळी पुणे विमानतळावर वेगवेगळ्या खासगी कंपनीच्या विमानचे उड्डाण सुरू होते. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या विमानाने लोहगाव विमानतळावरून टेक ऑफ केले. मात्र त्यांच्या विमानाला एटीएसने कुठली हरकत घेतली नाही. एका बाजूला मोदींची सभा सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या मित्र पक्षातील मंत्री विमानाने प्रवास करतात हे चालते. परंतु विरोधी पक्षांतील नेत्यांच्या विमान प्रवासाला जाणीवपूर्वक विरोध केला जातो.
भाजपने जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. मोदी यांची सभा पुण्यात आयोजित केल्यापासून टिळक रस्ता, शास्त्री रस्ता दुपारी बारा पासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्ते बंद करण्यात आले होते. या सगळ्यात सत्ताधारी पक्षाची हुकूमशाही दिसून आल्याची टीका जोशी यांनी केली. फुले सभागृहातच्या आवारात पार पडलेल्या सभेला पुणे कँटोमेन्ट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नूतन शिवरकर, माजी खासदार रजनी पाटील, शिवाजी केदारी, सचिन तावरे, विनोद मथुरावाला, संगीता तिवारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.