शरद पवार सांगतात ते कारण राजीनाम्यामागे असू शकत नाही
पुणे: राज्य बँक एकट्या अजित पवारांनी चालवली नाही. बँकेतील घोटाळ्यासंदर्भात ईडीने अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जे कारण सांगितले ते यामागे असूच शकत नाही. खरं तर, अजित पवार यांनी दिलेला राजीनामा हा गेल्या काही वर्षांत त्यांना जाणीवपूर्वक बाजुला ठेवल्याचा परिणाम आहे आणि अजित पवार हे तळागाळापर्यंत पोहोचलेले नेते असल्याने ते राजकारण सोडू शकत नाहीत. अजित पवार हे शांत बसणारं व्यक्तिमत्व नाही, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील घडामोडी व अजित पवार यांच्या राजीनाम्यावर व्यक्त केले आहे.
अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी खासदार संजय काकडे यांना विचारले असता ते बोलत होते. खासदार काकडे म्हणाले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याची जी कारणं शरद पवार यांनी दिली ती कारणं त्यामागे असू शकत नाहीत. अजित पवार हे पक्का निर्णय घेणारे आहेत. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यानंतरचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार हेच सर्वात मोठे नेते आहेत. राज्यात सर्वदूर अजित पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे अजित पवार यांना बाजुला केल्यास ते त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देणार नाहीत. राज ठाकरेंप्रमाणे ते पक्ष काढतील किंवा वेगळा गट करतील. गेल्या 20 वर्षांपासून मी अजित पवार यांना जवळून ओळखतो. ते शांत बसणारं व्यक्तिमत्व नसल्याने ते राजकारण सोडणार नाहीत. आणि त्यामुळे अजित पवार यांना बाजुला करणं शरद पवारांना खूप महागात पडेल.
अजित पवार यांनी राजीनामा देण्याची घटना हा स्टंट नसेल. ते भाजपच्या संपर्कात आहेत किंवा नाहीत, किंवा त्यांना भाजपमध्ये घ्यायचं की नाही हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, असेही खासदार काकडे म्हणाले.
शरद पवार यांच्यावर ईडी चा गुन्हा दाखल होणं ही प्रक्रिया आहे. यात सरकार किंवा भाजपाचा काहीही संबंध नाही. शरद पवारांकडून याचे भावनिक राजकारण केले गेले. परंतु, संपूर्ण महाराष्ट्राला हे प्रकरण माहिती आहे. त्यामुळे पवारांना सहानुभूती मिळणार नाही, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.
भाजपसह महायुती 240 जागा जिंकेल!
भाजपाला महाराष्ट्रात अतिशय चांगले वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे राज्यातील जनता भाजपाच्या मागे आहे. त्यामुळे भाजपसह महायुती 240 जागा जिंकेल, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला. तसेच, अजित पवार बाजुला निघाले तर, त्याचा आणखी जास्त फायदा भाजप महायुतीलाच होईल, असेही खासदार काकडे म्हणाले.
मुख्यमंत्री माझ्याबाबतीतला निर्णय घेतील
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या बाबतीत जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि त्याप्रमाणेच मी काम करेल, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.