पुणे– कमी जागा असतानाही सरकार कसे स्थापित करावे ही गोष्ट शरद पवारांकडून शिकलो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टिट्युटच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या इंस्टिट्युटचे शरद पवार चेअरमन आहेत. याच कार्यक्रमात पवारांचे कौतुक करताना सीएम उद्धव ठाकरे बोलत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानेच शिवसेनेने 28 डिसेंबर रोजी राज्यात सरकारची स्थापना केली.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार -सीएम
कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, कमीत-कमी जागेवर जास्तीत-जास्त पीक कसे घ्यावे हे शिकण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. खरं तर शरद पवारांनी आम्हाला शिकवले की पीक उत्पादन कसे वाढवावे. त्यांनीच आम्हाला कमीत-कमी जागा असतानाही सत्ता कशी स्थापित करावी हे देखील शिकवले.” याचवेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा पुनरुच्चार केला.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जातील. ही योजना मार्च 2020 पासून लागू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या रांगेत उभे राहण्याची किंवा ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या नादात पडावे लागणार नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्जमाफीला अपुरी असे म्हटले होते. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार असे आश्वासन देऊन सरकारने आता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असे ते म्हणाले होते. त्याच टीकेला वेळोवेळी उत्तरे देताना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ व दिग्गज नेते उपस्थित आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कल्लपण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. अजित पवारांनी नेमकी आपल्या प्रतिस्पर्ध्याला मित्रत्वाची साद घालण्याकरिता आवाडे यांच्या नावाची पाटी बाजूला सारुन पाटील यांची पाटी शेजारी ठेवत त्यांना शेजारी बसवून घेतले. त्यानंतर कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये हशा पिकला .अजित पवार यांनी शेजारी बसवून घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत कार्यक्रम संपेपर्यंत विविध विषयांवर चर्चा करत गप्पा मारल्या. मात्र, संपूर्ण कार्यक्रमात हाच चर्चेचा विषयही झाला होता.