मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) संदर्भातील गोंधळाच्या स्थितीविषयी विधान केले आहे. ते म्हणाले की, एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही. सीएएमुळे राज्यात कोणाला त्रास होणार नाही आणि एनपीआर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचा एक भाग आहे. मात्र या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एनपीआर आणि सीएए लागू करण्याच्या निर्णयाबद्दल काही स्पष्ट सांगितले नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंच्य या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीएए, एनपीआर आणि एनआरसी बाबत मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे मत आहे. मात्र आमचा याला विरोध आहे असे पवार म्हणाले.
‘सीएए, एनआरसी आणि एनपीआर तिन्ही वेगवेगळे
उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सीएए, एनआरसी आणि एनपीआर तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामुळे कोणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही राज्यात एनआरसी लागू करणार नाहीत. सीएएमुळे राज्यातील कोणत्याच नागरिकाला घाबरण्याचे कारण नाही. तर एनपीआर दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचा एक भाग आहे.
तर या मुद्द्यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा सांगितले की, एनपीआर, सीएए आणि एनआरसी मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचे स्वतःचे मत असू शकते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने संसदेत याविरोधात मतदान केले आहे.